मुंबई : एरवी सरकारी कारभार आणि विविध योजनांसाठी प्रशासनाने म्हणजेच सनदी अधिकाऱ्यांनी तयार केलेली कागदपत्रे भरताना नागरिक हैराण होऊन जातात; पण सध्या राज्यातील सनदी अधिकारी त्यांच्याविषयीची विविध प्रकारच्या माहितीची २४ पाने लिहून हैराण झाले आहेत. कोणत्याही योजनेचा लाभ असो की एखादे प्रमाणपत्र वा सरकार दप्तरी नोंद असो, नागरिकांना विविध प्रकारचे अर्ज, कागदपत्रे भरावी लागतात. आता अशीच सरकारी कागदपत्रे भरून हैराण होण्याची वेळ राज्यातील सनदी अधिकाऱ्यांवर आली आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या ई-सेवा पुस्तिकेचे काम सरकारी पातळीवर हाती घेण्यात आले असून त्यासाठी ई-एचआरएमएस प्रणालीत (मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली) आयएएस अधिकाऱ्यांची माहिती भरण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास २४ पानी प्रश्नावली अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. एवढी कागदपत्रे भरायची या कल्पनेनेच अनेकांना कंटाळा आला आहे. या माहितीमध्ये अनेक प्रश्न हो किंवा नाही असे उत्तर देण्याचे असून वैयक्तिक शैक्षणिक, वैवाहिक, आरोग्यविषयक, नोकरीविषयक माहिती यात भरायची आहेत. यात राज्यघटनेची शपथ घेतली का, गोपनीयतेची शपथ घेतली का, असे प्रश्नही आहेत. त्याशिवाय सनदी अधिकारी झालो का, अशा प्रश्नांचा अर्थच काय, अशी प्रतिक्रियाही उमटत आहे.