मुंबई : नोव्हेंबरमध्ये मुंबईत झालेल्या गोवरच्या उद्रेकामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसह राज्य सरकारही सक्रिय झाले होते विशेष कृती दलाने दिलेल्या सूचनेनुसार लसीकरणावर भर देण्यात आला. त्यानुसार मागील दोन महिन्यांमध्ये मुंबईमधील जवळपास दीड लाखांपेक्षा अधिक मुलांचे लसीकरण करण्यात आले परिणामी मुंबईतील गोवरची रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे मागील आठवड्यात मुंबईत तीन दिवस गोवरचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे मुंबईतील गोवरचा उद्रेक आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईत गोवरचे रुग्ण सापडू लागले होते. गोवंडी, शिवाजीनगर या परिसरात गोवरचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. कुर्ला, मालाड आणि दादर या भागामध्ये गोवरचे रुग्ण अधिक आढळून आले. त्यानंतर गोवरचे रुग्ण मुंबईतील विविध भागांमध्ये सापडू लागले. करोना काळात नियमित लसीकरण मोहीम थंडावल्याने अनेक बालकांना गोवर रूबेला लस मिळाली नाही. ही बाब लक्षात घेता आणि मुंबईतील गोवरची वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबई महापालिकेने तातडीने कार्यवाही करून लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून नियमित लसीकरण सत्रांबरोबरच अतिरिक्त सत्रांचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत ८०८० नियमित लसीकरण सत्रे घेण्यात आली असून त्यातून ३० हजार ५९८ बालकांना गोवर रूबेला लसीची मात्रा देण्यात आली. तसेच ४ हजार ३०८ अतिरिक्त लसीकरण सत्रांमधून ३३ हजार २७५ बालकांना गोवर रूबेला लसीची मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे बांधकामाच्या आणि पुलाखाली राहणाऱ्या बालकांसाठी महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत २३५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या लसीकरण सत्रांबरोबर राज्य सरकारच्या कृती दलाने दिलेल्या सूचनेनुसार विशेष लसीकरण मोहीम राबवण्यासाठी गोवरचा उद्रेक असलेल्या भागांमध्ये महापालिकेने ८३ लसीकरण केंद्रे सुरू केली. या लसीकरण केंद्रामधून ६ ते ९ महिने वयोगटातील २७४१ तर, नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एक लाख १६ हजार ९०० बालकांचे लसीकरण करण्यात आले. मुंबईतील दीड लाखापेक्षा अधिक बालकांचे लसीकरण करण्यात आल्याने गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. गोवर बाधित रुग्णांची संख्या शून्यावर येताना दिसत आहे. मुंबईमध्ये आठ दिवसांत तीनवेळा रुग्णसंख्या शून्यावर आली होती. मुंबईत ३१ डिसेंबर २०२२ रोजी एकही गोवर बाधिताची नोंद झाली नाही. त्यानंतर ६ आणि ७ जानेवारी २०२३ रोजी सलग दोन दिवस गोवरचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मुंबईतील गोवर रुग्ण संख्येची वाटचाल ही शून्याच्या दिशेने होत असून, लवकर संपूर्ण गोवरची साथ आटोक्यात येईल, असे मत तज्ज्ञांनी वर्तवले आहे.