लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. या लोकलविषयी मुंबईकरांना खूपच आत्मीयता आहे. यामुळेच शहराबाहेर गेले की आमची लोकल कती चांगली आहे याचे ते तोंडभरून कौतुक करत असतात. पण हेच मुंबईकर या गाडीला पाच मिनिटे जरी वेळ झाला तरी रेल्वे व्यवस्थेवर तोंडसुख घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. मात्र ही लोकलसेवा कोणत्याही परिस्थित सुरू राहावी यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा अव्याहत काम करत असते. याच ‘रेल्वे व्यवस्थापन प्रणाली’विषयी जाणून घेऊ या. ‘पाच मिनिटे झाली एकही गाडी आली नाही. या रेल्वे कर्मचाऱ्यांचे ना लक्षच नसते.’ दादरच्या प्लॅटफॉर्मवर एक तास उभे राहिल्यास किमान तीन ते चार वेळा तरी प्रवशांकडून अशी वाक्ये कानी पडतात. प्रवाशाला कुठे तरी पोहचायचे असते. तेथे जाण्यास उशीर झाल्यामुळे त्याच्या जिवाची ही घालमेल सुरू असते. मात्र संपूर्ण दिवसभरात असाही एकही क्षण येत नाही की, गाडी विनाकारण थांबवून ठेवण्यात आली आहे. या गाडय़ा चालविण्याची यंत्रणाच अशी तयार करण्यात आली आहे. याला ‘ट्रेन व्यवस्थापन प्रणाली’ असे म्हणतात. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील विभागीय कार्यालयात पहिल्या मजल्यावर एक भलीमोठी अर्धवर्तुळाकार इलेक्ट्रॉनिक भिंत बसविण्यात आली आहे. या भिंतीवर चर्चगेट ते विरार या ६० किमीच्या मार्गावर ट्रॅकवर असणाऱ्या सर्वच गाडय़ांची सद्य:स्थिती दिसत असते. कोणती गाडी कोणत्या स्थानकात आहे इथपासून ते तिचा प्रवास वेळापत्रकानुसार सुरू आहे की नाही इथपर्यंतचा सर्व तपशील यामध्ये समजतो. तसेच जर गाडीच्या नियमित प्रवासात आयत्या वेळी कोणताही बदल करावयाचा असेल तर त्याची सूचना देण्याची सुविधाही या ठिकाणी आहे. यालाच नियंत्रण कक्ष असे म्हटले जाते. गाडीच्या प्रवासावर नियंत्रण ठेवणे सोपे जावे यासाठी या मार्गाचे दोन विभाग करण्यात आले आहेत. यात एक विभाग चर्चगेट ते अंधेरी यामध्ये १६ रेल्वे स्टेशन्स येतात. तर दुसरा विभाग अंधेरी ते विरार असून यामध्ये १२ स्थानकांचा समावेश आहे. या कक्षात एका वेळी चार माणसे काम करत असतात. यातील एक मुख्य दुसरा पर्यव्यक्षक आणि दोन जण विभाग नियंत्रक म्हणून काम पाहात असतात. यातील एक नियंत्रक चर्चगेट ते अंधेरी तर दुसरा नियंत्रक अंधेरी ते विरार या भागातील गाडय़ांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवून असतो. या दोन्ही नियंत्रकांना सहा तास काम करायचे असून या सहा तासांमध्ये त्यांचे संपूर्ण लक्ष स्क्रीनवर असणे बंधनकारक आहे. जर एखादी गाडी सिग्नल नसतानाही थांबली तर ती का थांबली याची माहिती घेऊन संबंधित स्टेशन मास्तरशी संवाद साधून आवश्यक ती उपाययोजना करणे त्यांचे मुख्य काम असते. गरज भासल्यास गाडी एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर वळवायची असेल तर नेमका काय परिणाम होईल याचा आढावा घेऊन स्टेशन मास्तरांशी थेट संपर्क साधण्याचा अधिकार या नियंत्रकांकडे आहे. २००३मध्ये बंबार्डियरने हे देशातील पहिले स्वयंचलित टीएमएस उभारून दिले. तेव्हापासून याचे काम अव्याहत सुरू आहे. या पूर्वीही व्यवस्थापन होत असे. मात्र ते नियंत्रकांना हाताने करावे लागत असे. कोणती गाडी वेळापत्रकापेक्षा किती वेळेत व किती उशिरा स्थानकावर पोहचली याचा तपशील संबंधित स्थानकांची संवाद साधून मग तो लिहून ठेवावा लागत असे. एक फूलस्केपचे पान लिहण्यासाठी अर्ध्या तसाचा अवधी जात असे. याचबरोबर हे काम खूप वेळखाऊ होते. यामुळे ही स्वयंचलित प्रणाली अस्तित्वात आली. आज पश्चिम रेल्वेची उपनगरीय वाहतूक पूर्णत: स्वयंचलित पद्धतीने चालते. पश्चिम रेल्वेकडे आजमितीस ८६ गाडय़ा असून त्यांच्या दिवसाला १३१३ फेऱ्या होतात. या फेऱ्यांचे एक स्वतंत्र वेळापत्रक आहे. प्रत्येक फेरीसाठी गाडिला विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. हे सर्व क्रमांक संगणीकृत करण्यात आले आहेत. यामुळे गाडी चर्चगेट रेल्वे स्थानकात पोहोचताच ती पुन्हा कुठे जाणार याचे इंडिकेटर स्वयंचलित प्रणालीने लागते. चर्चगेट स्थानकात इंडिकेटर लागले की ती गाडी पुढच्या स्थानकात जाण्याच्या आधी तेथील इंडिकेटर बदलत जाते. हे सर्व काम स्वयंचलित प्रणालीने होत असते. अशीच प्रणाली सिग्नलसाठीही आहे. या मार्गावरील सर्व सिग्नल यंत्राही स्वयंचलित असून गाडी गेली की सिग्नलचा रंग बदलत जातो. प्रत्येक रंगाच्या सिग्नला विशिष्ट वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या मार्गावर २० हून अधिक सिग्नल नियंत्रण टॉवर्स असून ५०० हून अधिक सिग्नल्स आहेत. कोणता सिग्नल कोणता रंगाचा आहे याचा तपशील मुंबई सेंट्रलमधील या टीएमएस भिंतीवर दिसत असतो. इंडिकेटर किंवा सिग्नल यंत्रणा स्वयंचलित असली तरी दादर, अंधेरी, बोरिवली अशा महत्त्वाच्या स्थानकांमध्ये या यंत्रणांचे नियंत्रण स्टेशन मास्टरच्या हातात असते. कारण या बडय़ा स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्मची संख्या जास्त असते. तसेच तेथे बाहेरगावच्या गाडय़ांना थांबाही असतो. यामुळे अशा स्थानकांमध्ये आयत्या वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक बदलू शकतो. याचा निर्णय स्टेशन मास्टरने आयत्या वेळी घेऊन सिग्नल देण्याची यंत्रणा या स्थानकांमध्ये देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात आता जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून नियंत्रक संबंधित गाडीच्या मोटरमन अथवा गार्डशी संपर्क साधू शकतात. आत्तापर्यंत अनेक आणीबाणीच्या प्रसंगामध्ये नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत आहे त्या परिस्थितीत रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या नियंत्रण प्रणालीचा सर्वाधिक वापर ११ जुलै २००७च्या रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोटांच्या वेळी झाला होता. या वेळी अनेक गाडय़ा दुसऱ्या मार्गावरून वळविण्याचा निर्णय घेण्यात या प्रणालीचा फायदा झाल्याचे येथील अधिकाऱ्याने सांगितले. आपली जीवनवाहिनी अविरत न थांबता काम करत राहावी यासाठी मागे कुठे तरी एक मोठी यंत्रणा आणि मनुष्यबळ अव्याहतपणे कार्यरत असते. ही यंत्रणा नसती तर आज आपण जितक्या सुलभतेने प्रवास करू शकतो तितक्या सुलभतेने तो करू शकलो नसतो. नीरज पंडितं @nirajcpandit niraj.pandit@expressindia.com