राज्यातील एक वरीष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचं प्रकरण अजूनही वाजत असताना आता दुसऱ्या एक वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून नवा वाद सुरू झाला आहे. रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमधून राज्यातल्या पोलीस बदली रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत गंभीर दावे केले आहेत. “रश्मी शुक्ला पाया पडत म्हणाल्या होत्या मै माफी मांगती हूँ, मेरा लेटर वापस दे दो”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

“सरकार शिवरायांची शिकवण विसरलं!”

रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची शिकवण विसरलं, असं म्हटलं आहे. “सरकारकडून आपण खूप मोठ्या ह्रदयाचे आहोत, हे दाखवण्याची चूक झाली. शिवाजी महाराजांचं तत्व होतं, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरलं होतं”, असं ते म्हणाले. “सगळ्या चुका करून जर रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या. माझे पती नुकतेच वारले आहेत असं म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आलं नाही”, असा देखील दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

“माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि फटकेबाजी”, देवेंद्र फडणवीसांची राजकीय टोलेबाजी!

“रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट”

“आत्तापर्यंत हे कुणी बोलायला तयार नव्हतं. आता बोलतील. चौबे नावाचे अधिकारी कायदा-सुव्यवस्था सह आयुक्त होते. सर्वात मोठी पोस्ट होती. ते स्वत:साठी पोस्टिंग मागतील का? त्यांचे संबंध थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत असतात. ते कुठल्यातरी नवाज, इंगोलेसोबत बोलतील का? यांनीच माणसं प्लांट करायची, यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, यांनीच ते टेप करायचं आणि यांनीच त्याचा वापर बाजारात करायचं. मला रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट म्हणून काम करतात हे सांगायचं होतं, म्हणून मी यड्रावकरांचं ट्वीट केलं”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

शिरोळच्या आमदारांवर रश्मी शुक्लांचा दबाव?

जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी दुपारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत एक ट्वीट केलं होतं. “शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकासआघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर रहावं, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजेत?”, असा सवाल त्यांनी ट्वीटमधून उपस्थित केला होता.

 

या मुद्द्यावरून नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.