गर्भवती महिलेच्या पोटात मुदतीपूर्वीच दुखू लागल्याने गर्भातील तिळ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता होती. मात्र तत्काळ सिझेरियनच्या माध्यमातून प्रसूती करण्याचा निर्णय घेत कामा रुग्णालयातील डॉक्टरांना तीन बाळांना जीवनदान देण्यात यश आले. परंतु गर्भधारणेचा कालावधी अपुरा असल्यामुळे मुदतपूर्व जन्मास आलेल्या तीन्ही अर्भकांचे वजन कमी होते. भिवंडी येथे राहणारी रुबीना परवीन असलम शेख (३०) या दुसऱ्यांदा गर्भवती झाल्या. यावेळेस त्यांना तीन बाळांची (तिळे) गर्भधारणा झालेली होती. गर्भधारणेचा कालावधी ३५ आठवड्यांचाच होता. रुग्णालयामध्ये दाखल केले त्याच दिवशी त्यांच्या पोटात दुखू लागले. गर्भात तीन बालके असल्याने बाळांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून तत्काळ सिझेरियन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. तीन्ही बाळांना सुखरूप जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आले. परंतु गर्भधारणेचा कालावधी अपुरा असल्यामुळे मुदतपूर्व जन्मास आलेल्या तिन्ही अर्भकांची वजन कमी होते. पहिले आणि दुसरे बाळ मुलगी असून त्यांचे वजन अनुक्रमे १.१८४ ग्रॅम आणि १.७३२ ग्रॅम इतके आहे. तर तिसरे बाळ मुलगा असून त्याचे वजन १.८३८ ग्रॅम आहे. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने तिन्ही अर्भकांचे वजन कमी आणि त्यांना श्वसनाचा त्रास होत असून त्यांना तत्काळ नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. हेही वाचा >>> VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये तिन्ही अर्भकांची स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना ताबडतोब प्राणवायू यंत्रणेवर ठेवण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी औषधे आणि जंतूसंसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिजैविके सुरू करण्यात आली. कमी वजनाच्या बालकांना कुठलाही जंतुसंसर्ग पटकन होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे बाळांना क्युबिकल्समध्ये ठेवण्यात आले होते. क्युबिकल्सप्रमाणे त्यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, कपडे आणि उपकरणे यांचे नियमित आणि सातत्याने निर्जंतुकीकरण करण्याची काळजी परिचारिकांकडून घेण्यात आली. तिन्ही बाळांना पुरेल इतक्या दुधाचा स्राव मातेला सुरू झाला नव्हता. त्यामुळे तिन्ही बाळांची श्वसन प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर त्यांना दुधपेढीतील दूध नळीद्वारे देण्यास सुरुवात करण्यात आली. तीन बाळांची गर्भधारणा, अपुऱ्या कालावधीमध्ये झालेली प्रसूती व त्यामुळे रुबीना यांना आलेला मानसिक तणाव आणि त्यासोबतच वाढलेला रक्तदाब यावरही योग्य ते औषधोपचार करून त्यांना समुपदेशन करण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे आणि डॉक्टर श्रुती डाले यांच्या मार्गदर्शनाखालील औषधोपचार, रुग्णालयांतील अन्य डॉक्टांरांनी घेतलेले अथक परिश्रम आणि विभागाच्या प्रमुख परिचारिका ज्योती डाके, परिचारक प्रवीण कोष्टी, सहाय्यक अधिसेविका निरुपमा डोंगरे यांनी इतर परिचारिकांना केलेले मार्गदर्शन यामुळे २६ दिवसांनी माता आणि तिन्ही बालकांना सुखरूप घरी पाठवण्यात आले.