मुंबई : राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी काही मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नसल्यामुळे लोकांची कामे अडून पडली आहेत, याकडे लक्ष वेधले. सध्या पितृपक्ष सुरू आहे. त्यामुळे काही मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही, असू सांगून, असे कुठे असते का, जग कुठे चालले आहे, असा सवाल करीत त्यांनी शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांना फटकारले. देवदर्शनासाठी किती वेळ? गणेशोत्सव काय राज्यात प्रथमच साजरा होतो आहे असे नाही. आम्हीही दर्शनासाठी जात असतो. पण राज्याच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने देवदर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्याला काही मर्यादा असतात. मिरवणुका किती काळ चालणार यालाही काही बंधने हवीत. ३६ तास मिरवणुका चालल्याबद्दलही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.