लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह उपनगरांत पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव होऊन मुंबईकर हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे अंगाची लाही होत आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरण होते. काही भागात पहाटे पावसाचा शिडकावा देखील झाला. तसेच सायंकाळी वातावरणात गारवा जाणवत होता. आणखी वाचा-मुंबई : एम पूर्व व एम पश्चिम विभागात २९ मे रोजी पाणीपुरवठा बंद दरम्यान, पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३.८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आर्द्रता ७० टक्क्यांहून असली तरी मागील काही दिवसांपेक्षा मुंबईकरांना या दोन दिवसांत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या पश्चिमेकडून वारे वाहणार आहेत. यामुळे मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.