मुंबई: वर्षांनुवर्षे विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यानुसार येत्या १ मेपासून कैद्यांसाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजनेच्या माध्यमातून अल्प व्याजावर ५० हजार रुपयांचे कर्ज कैद्याच्या परिवाराला देण्यात येणार आहे. येरवडा कारागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रदिनी या योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगणारे हजारो कैदी आहेत. यातील अनेकजण सराईत गुन्हेगार नसतात. तर कौटुंबिक किंवा भाऊबंदकी वादातून तसेच छोटय़ा छोटय़ा वादांतूनही शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचे प्रमाण अधिक असते. हे कैदी शिक्षा भोगत असताना त्यांच्या कुटुंबाची वाताहात होते. त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. त्यामुळे सामाजिक दायित्वाच्या भावनेने बँकेने केवळ कैद्यांसाठी ही अभिनव कर्ज योजना आणली आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा कारागृहातील २०० कैद्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने अन्य कारागृहांत ही योजना सुरू करण्यात येणार आहे. कैद्यांच्या कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी, शेतीची कामे करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, औषधोपचाराकरिता ५० हजापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. कैद्यांच्या करागृहातील उत्पन्नाचा विचार करून हे कर्ज दिले जाणार असून या कर्जावर केवळ सात टक्के व्याज असेल. या कर्जासाठी जामीनदाराची किंवा तारण ठेवावे लागणार नाही. तसेच कर्ज परतफेड रकमेच्या १ टक्का निधी बँक कैद्यांच्या कल्याण निधीसाठी देणार आहे.