मुंबई : गेल्या कित्येक शतकांत मानव व प्राण्यांतील बदलत गेलेल्या नात्यापासून सध्या परवलीचा शब्द असलेल्या मेटाव्हर्सपर्यंत आणि एव्हरेस्टच्या शिखरापासून मानसच्या जंगलापर्यंत विविध विषयांना स्पर्श करणारा ‘लोकप्रभा दिवाळी अंक २०२२’ प्रकाशित झाला आहे. अंक राज्यभर सर्वत्र उपलब्ध आहे केवळ ५० रुपयांत. २० लाख वर्षांपूर्वी शाकाहारी असणारा मानव मांसाहाराकडे कधी, का आणि कसा वळला असावा? या प्रदीर्घ सहप्रवासात मानव आणि प्राण्यांतील नाते कसे बदलत गेले आणि भविष्यात सहजीवन कायम राखण्यासाठी काय केले पाहिजे, याचा लेखाजोखा डॉ. उज्ज्वला दळवी यांनी ‘गोष्ट मनुष्यप्राण्यांची’ या लेखात घेतला आहे. ‘मेटा मनमर्जियाँ’ या लेखात दिलीप टिकले यांनी वास्तव जगावर आभासी जगाने कसे गारूड केले आहे, याचा वेध घेतला आहे. या दोन्ही जगांतील अस्पष्ट होत जाणाऱ्या सीमारेषांविषयीही त्यांनी भाष्य केले आहे. मिरेया मेयर ही वकील होण्याचे स्वप्न बाळगणारी मुलगी, महाविद्यलयात असताना फुटबॉल सामन्यांत चीअरगर्लचं काम करणारी. एका चित्रपटाने तिच्या आयुष्याला अगदी वेगळे वळण दिले आणि तिने आपले संपूर्ण आयुष्य वन्यजीवांसाठी वाहिले. तिची वाटचाल डॉ. विनया जंगले यांनी शब्दबद्ध केली आहे. एव्हरेस्टवर गिर्याहोरण मोहिमा सुरू झाल्या १९२२पासून. यंदा त्याला १०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गेल्या १०० वर्षांंच्या काळात एव्हरेस्ट मोहिमांचे स्वरूप कसे बदलत गेले, याचा आढावा हृषीकेश यादव आणि सुहास जोशी यांनी ‘एव्हरेस्ट मोहिमेची शंभरी’ या लेखात घेतला आहे. चित्रपट आणि मालिकांमधून भारतात पोहोचलेली कोरियन संस्कृती आणि तिचा आजच्या तरुणाईवरील प्रभाव प्राची साटम यांच्या हा ‘हाऽऽल्यूवर स्वार’ या लेखात प्रतिबिंबित झाला आहे. डॉ. संजीव कुलकर्णी यांची यांची ‘नॉट, विदाऊट अ फाइट’ ही कथा शेतीतून अधिकाधिक आणि नवनवी उत्पादने मिळविण्याच्या स्पर्धेत मानवी आरोग्यावर आणि एकंदरीत जैवविविधतेवर होणारम्य़ा दुष्परिणामांवर नेमके बोट ठेवते. ‘मानसच्या जंगलात’ या डॉ. राधिका टिपरे यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनात ईशान्य भारतातील जंगलांचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले आहे. विख्यात चित्रकार श्रीकांत जाधव यांच्या चित्रकलेतील प्रवासावर ‘सहजतेतील सौंदर्यशोध’ या लेखात विनायक परब यांनी प्रकाशझोत टाकला आहे. जाधव यांच्याच आगळ्या शैलीतील निसर्गदृश दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर विराजमान आहे. तर सह्यद्रीच्या डोंगरकडय़ांवरून महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसरे टोक गाठणारम्य़ा प्रसाद निक्ते यांनी याच प्रवासातील ‘नर्मदेच्या किनारी’ अनुभवलेला आदिवासींच्या प्रथा— परंपरा आणि शहरवासीयांनाही लाजवणारे आदरातिथ्य वर्णन केले आहे. हा दर्जेदार शब्दफराळ केवळ ५० रुपयांत राज्यात सर्वत्र उपलब्ध आहे.