मुंबई : मुंबई महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला असून आता पुढील निवडणूक होऊन सत्ता स्थापनेपर्यंत पालिकेचा कारभार प्रशासनाच्या म्हणजेच आयुक्तांच्या हाती असेल. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांवर मंजुरीची मोहर उमटविली. पालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे ८ मार्चपासून प्रशासक या नात्याने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना मुंबई महापालिकेचा कारभार सांभाळावा लागणार आहे. अखेरच्या दिवशी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात ३७० प्रस्ताव सादर करण्यात आले होते. भाजपचा विरोध असतानाही अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली. नियमबाह्य पद्धतीने मंजूर केलेल्या प्रस्तावांचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपने आयुक्तांकडे केली.