मुंबई : यापुढे सहा महिन्यांच्या बालकांना गोवर लशीची पहिली मात्रा देण्यात यावी, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुंबईसह राज्यात गोवरचे सर्वाधिक रुग्ण हे ९ महिन्यांचे लसपात्र वय होण्याच्या आतील असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. मुंबईसह मालेगाव, भिवंडी या शहरांमध्ये गोवरचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. मृतांचा आकडाही दिवसागणिक वाढत असताना लागण झालेल्यांमध्ये लसीकरण न झालेली बालके सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सहा महिन्यांच्या मुलांना गोवरची लस देण्याचे तसेच नऊ महिन्यांवरील बालकांना गोवर लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. केंद्राकडून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अमलबजावणी करून आम्ही लसीकरण वाढवण्यावर भर देऊ, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. महाराष्ट्रासह बिहार, गुजरात, झारखंड, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गोवरची साथ पसरली आहे. या पार्श्वभूमीवर २३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निती आयोग, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया प्रांताचे अधिकारी आणि भारतातील जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत ज्या विभागांमध्ये गोवरची साथ मोठय़ा प्रमाणात पसरलेली आहे, तेथे नऊ महिने ते पाच वर्षांमधील मुलांना लसीचा अतिरिक्त डोस देण्यात यावा तसेच ज्या भागामध्ये गोवरच्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण हे नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाचे असतील अशा भागात सहा महिने ते नऊ महिन्यांपर्यंतच्या मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात यावी, असे मंत्रालयाचे सहसचिव पी. अशोक बाबू यांनी दिले. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये गोवर आणि रूबेलाचा पहिला डोस ८९ टक्के तर दुसरा डोस ८२ टक्के बालकांनी घेतलेला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर आणि रूबेलाचे पूर्णत: निर्मूलन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे ठरवलेली आहेत. केंद्राच्या सूचना संशयित रुग्ण तातडीने शोधा उद्रेक झालेल्या भागांत लसीकरण मोहीम राबवा ५ ते ६ वर्षांपर्यंत लशीची अतिरिक्त मात्रा द्या जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करा मुलांच्या सकस आहारावर भर द्या मुलांना ‘अ’ जीवनसत्त्वाच्या गोळय़ा द्या जुलाब, श्वसनाचा त्रास असल्यास रुग्णालयात दाखल करा रुग्णांवर आठवडाभर विलगीकरणात उपचार करा