शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे व्यंकय्या नायडूंना पत्र नवी दिल्ली : पैशाची अफरातफरी केल्याच्या आरोपाखाली माझ्यासह राज्यातील दोन कॅबिनेट मंत्री, दोन ज्येष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल. महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगात टाकू आणि राज्यात विधानसभेची निवडणूक घेऊ, अशी धमकी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दिले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर सातत्याने दबाव आणला जात असून काही जण मला भेटायलाही आले होते. मी त्यांची मागणी धुडकावली. मला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. तुरुंगात गेलेल्या माजी रेल्वेमंत्र्यांसारखे मलाही तुरुंगात खितपत पडावे लागेल, अशी धमकी त्यांनी दिली, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार, नेते, माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र यांच्या मागे ‘ईडी’ने चौकशीचा ससेमिरा लावला असून त्यांचा छळ केला जात आहे. जमिनीच्या व्यवहाराबद्दल चौकशी करण्याचा ‘ईडी’ला अधिकार नाही. माझ्या मुलीच्या लग्नसमारंभाच्या आयोजनातील कंत्राटदारालाही त्रास दिला जात आहे. पण मी या धमक्यांना घाबरत नाही, मी यापुढेही सत्य उघड करेन, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. ‘ईडी’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा ‘माफिया टोळी’ चालवत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. मी पुढील पत्रकार परिषद शिवसेना भवन आणि त्यानंतर ‘ईडी’च्या कार्यालयासमोर होईल, असा इशारा राऊत यांनी दिला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी लक्ष्य केले. फडणवीस यांना माहीत आहे, मला काय म्हणायचे आहे. या कारस्थानाचे सूत्रधार कोण आहेत हे उघड होईल, तुम्ही पाहात राहा. ‘ईडी’च्या कार्यालयात काही लोक बेकायदा बसून असतात, तेच निर्णय घेत आहेत. कोणाला चौकशीला बोलवायचे, कोणाला त्रास द्यायचा हे ठरवतात, असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबीयांनाही सातत्याने त्रास दिला जात आहे. बनावट पुरावे तयार केले जात आहेत. रोज एक माणूस उठतो आणि बेवडय़ासारखा बडबडतो. मग, ‘ईडी’ कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.