मुंबई : मुंबईकरांनी रस्त्यांवर, उघड्यावर तयार केलेले खाद्यपदार्थ, तसेच शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. उघड्यावरील व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने घडत असलेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईतील नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने विविध धोरणे, योजना आणि अभियान महानगरपालिकेतर्फे राबविले जाते. ऋतूनिहाय आजारांची जनजागृती आणि उपाययोजना याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून नियमितपणे पाठवण्यात येते. सध्या उन्हाळ्यामुळे वाढलेले तापमान व त्यातून अन्नपदार्थांवर होणारे परिणाम आणि अलीकडे घडलेल्या विषबाधेच्या घटनेच्या अनुषंगाने महानगरपालिका आरोग्य प्रशासनाकडून मुंबईतील नागरिकांना आवाहन करणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. मुंबईतील जवळपास १ कोटी ३० लाख लोकसंख्येला महानगरपालिका विविध नागरी सेवा-सुविधा पुरवत असते. मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात काही वेळा रस्त्यावरील खाद्यपदार्थ स्वस्त किंवा सहजपणे उपलब्ध असल्यामुळे त्याचे सेवन केले जाते. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणांवर उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा…राज्य लोकसेवा आयोगाची ६ जुलै रोजी परीक्षा, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

अनेकदा रस्त्यांवरील, उघड्यांवरील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे, बरेचदा शिळे व योग्य पध्दतीने साठवलेले नसल्याचे निदर्शनास येते. त्यातही उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. खराब व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अन्न विषबाधा सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नुकतेच महानगरपालिका क्षेत्रातील पी उत्तर आणि एम पूर्व विभागामध्ये उघड्यावरील खाद्यपदार्थातून अन्न विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या अन्न विषबाधेमुळे जीवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

हेही वाचा…शिखर बँक घोटाळा : तपास बंद करण्याच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मूळ तक्रारदारांची उच्च न्यायालयात मागणी

पालिकेतर्फे करण्यात आलेल्या सूचना

-बाहेरील व रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांकडून पेय आणि खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे.

-शक्यतो घरात शिजवलेले, ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. शिजवलेले अन्न झाकून ठेवावे. शिळे अन्न खाणेदेखील टाळावे.
-चिकन, मटण व मासे यासारख्या पदार्थांचे सेवन करण्यआधी ते ताजे, स्वच्छ व व्यवस्थित शिजलेले आहेत, याची खात्री करुन घ्यावी.

-लहान मुले रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करणार नाहीत, याबाबतीत पालकांनी दक्षता घ्यावी.
-गर्भवती महिलांनी प्रामुख्याने दुसऱ्या तिमाहीमध्ये वैयक्तिक स्वच्छता व पौष्टिक आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

हेही वाचा…मुंबई विमानतळावरील धावपट्टी ९ मे रोजी बंद

-स्वच्छ पाण्याने धुवून हिरव्या भाजीपाला आणि फळे यांचे सेवन करावे.
-प्रसाधनानंतर व स्वयंपाकापूर्वी हात नियमितपणे स्वच्छ धुवावे आणि वैयक्तिक स्वछता पाळावी.

-उलटी, जुलाब, मळमळ व कावीळ यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका दवाखाने अथवा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.