मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत मिळून आतापर्यंत ५०.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी मिटली असली तरी हा साठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द होण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या आठ दिवसांत धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली आहे. उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत मिळून ७ लाख २६ हजार दशलक्ष लिटरहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. धरणे पूर्ण भरलेली असतात तेव्हा त्यामधील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असतो. १ ऑक्टोबरला सर्व धरणे पूर्ण भरलेली असतील तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. त्यामुळे पुढील दोन महिने धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे. सध्या केवळ तुळशी तलाव भरून वाहू लागला असून तानसा आणि विहार ही धरणेदेखील ८० टक्क्यांहून जास्त भरली आहेत. कोणत्या धरणात किती पाणी? उर्ध्व वैतरणा - २१.३८ टक्के मोडक सागर - ७८.२६ टक्के तानसा - ८९.२७ टक्के मध्य वैतरणा - ५९.१६ टक्के भातसा - ४२.०८ टक्के विहार - ८३.२७ टक्के तुळसी - १०० टक्के सोमवारी मध्यम ते मुसळधार मुंबई शहर आणि उपनगरांतील पाऊस रविवारी ओसरला असून रविवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने १३.९ मिमी तर सांताक्रुझ केंद्राने २०.१ मिमी पावसाची नोंद केली. सोमवारी शहरात मध्यम ते मुसळधार सरींचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदा १ जून ते रविवापर्यंत कुलाबा केंद्रात एकूण १,२७८.२ मिमि तर सांताक्रुझ केंद्रात १,७३९.९ मिमि पावसाची नोंद झाली आहे.