मालेगाव बॉम्बस्फोट खटला मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याच्या सुनावणीला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी गुरुवारी उपस्थिती लावली. मात्र आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या उपस्थितीला आक्षेप घेतल्याने त्यांना न्यायालयातून बाहेर जावे लागले. सुनावणीला उपस्थित राहता यावे यासाठी अर्ज केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी न्यायालयाला सांगितले. अनेक साक्षीदार फितूर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोटातील बळींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला पत्र लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर एटीएसचे अधिकारी खटल्याच्या सुनावणीला हजर राहतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानुसार एटीएसप्रमुखांच्या आदेशानुसार, दोन अधिकाऱ्यांनी खटल्याच्या सुनावणीस उपस्थिती लावली होती.