मुंबई-गोवा महामार्गावरील राजेवाडी फाट्याजवळील जुना पूल कोसळल्याचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करीत सरकारवर टीका केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवेदनाने समाधान न झाल्याने या प्रकरणात चंद्रकांत पाटलांवरच ३०२चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. जर मेमध्ये त्या पूलाची तपासणी झाली होती आणि तो वाहतुकीसाठी योग्य असल्याचे ठरविण्यात आले होते, तर मग ऑगस्टमध्ये तो कसा काय कोसळतो, असा सवाल अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. आम्ही सत्तेवर असताना विरोधकांकडून सातत्याने आमच्यावर ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जायची. आता आम्ही पण ही मागणी करतो आहोत, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
हा पूल पडणे हे सर्वस्वी राज्य सरकारचे अपयश आहे. नवा पूल बांधलेला असताना, जुना पूल वाहतुकीसाठी बंद का करण्यात आला नाही. जर तो पूल वाहतुकीसाठी बंद केला असता, तर आज या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या लोकांचे प्राण वाचले असते, असेही अजित पवार यांनी सरकारला सुनावले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. जर मे मध्ये संबंधित पुलाला वाहतुकीसाठी योग्य ठरविण्यात आले होते. तर मग तो पूल ऑगस्टमध्ये कसा काय पडतो. तो पूल वाहतुकीसाठी बंद ठेवायला हवा होता, असे त्यांनी सांगितले. राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही तो पूल वाहतुकीसाठी बंद करायला हवा होता, असे म्हटले.
घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, या प्रकरणी सरकार सतर्क असल्याचे निवेदन चंद्रकांत पाटील यांनी केले. या संपूर्ण प्रकरणाची लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकार दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old bridge collapse on mumbai goa highway opposition aggresive in vidhan sabha
First published on: 03-08-2016 at 11:48 IST