पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील ७०० रेल्वेस्थानकांचा ‘स्वच्छ भारत अभियाना’त समावेश करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे. सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक रेल्वे स्थानक दत्तक घेण्याच्या सूचना रेल्वेमंत्री करणार आहेत.
प्रभू यांनी रेल्वेमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रेल्वेच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या स्वच्छतेसाठी कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नसते. त्यासाठी रेल्वेमंत्री प्रभू यांनी ‘रेल्वेस्थानक दत्तक’ही योजना आखली आहे. देशभरात एकूण ७५०० रेल्वेस्थानके आहेत. त्यापैकी गर्दी असणाऱया व महत्त्वाच्या ७०० स्थानकांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱयांना ही स्थानके दत्तक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अधिकाऱयांच्या देखरेखीखाली या स्थानकांची नियमित स्वच्छता राखण्यात येणार आहे. तसेच, यापुढे रेल्वे प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्रीस बंदी घालण्याच्या विचारात प्रभू आहेत.