ठाणे रेल्वे यार्डाच्या आधुनिकीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून अजून अनेक कामे बाकी असल्याने पुढील काही दिवस सकाळच्या वेळी उपनगरी गाडय़ांचा गोंधळ कायम राहणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.  ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण आणि रेल्वे मार्गाचे नूतनीकरण यामुळे गुरुवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. शनिवारपासून सतत गाडय़ांचा होत असलेला खोळंबा मंगळवारी काही प्रमाणात कमी झाला. मात्र तरीही मंगळवारी सकाळी उपनगरी गाडय़ा २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. अद्याप काही छोटी छोटी कामे पूर्ण व्हायची असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.