मुंबई : राज्यपालांच्या निर्देशानुसार विधानसभेत बहुमत चाचणीसाठी प्रशासनाने सारी तयारी केली होती. शिवसेना व बंडखोर शिवसेना आमदार व त्यांच्या समर्थकांमध्ये गडबड होण्याची शक्यता गृहित धरून सुरक्षेचे सारे उपाय योजण्यात आले होते. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने विधानसभेतील शक्तिप्रदर्शन टळले आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार विश्वासदर्शक ठरावाची सारी तयारी विधान भवनात करण्यात आली होती. ठरावावर मतदान झाले असते तर भाजप व शिंदे गटाचे संख्याबळ किती नेकमी याची आकडेवारी समोर आली असती. सर्वोच्च न्यायालयाने चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ठाकरे यांच्या राजीनाम्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीला फारसी पसंत पडलेली नाही. संख्याबळ नव्हते हे स्पष्ट होते. पण विधानसभेत भाषण करण्याची संधी होती. ठाकरे यांनी ही संधी घालवली. कारण विधानसभेत केलेले भाषण साऱ्या राज्यासमोर आले असते. तसेच विधानसभेच्या रेकॉर्डवर कायम राहिली असती. भाजपला चिमटे काढण्याची किंवा टोले लगावण्याची चांगली संधी होती. पण ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय कुरघोडी करण्याची संधी घालविली. ठाकरे यांनी चाचणीला सामोरे जाऊन भाषण करायला पाहिजे होते. भाषणानंतर राजीनाम्याची घोषणा ठाकरे यांना करता आली असती, असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या अन्य माजी मंत्र्यांनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. त्यातही ठाकरे यांनी विधानसभेत भाषण करून मगच राजीनामा द्यायला पाहिजे होता, अशी भावना व्यक्त करण्यात आली.