मुंबई : रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ शनिवार, १ ऑक्टोबरपासून लागू होत आहे. नव्या भाडेदर पत्रकानुसार रिक्षातून दिवसा पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी ७७ रुपये, तर टॅक्सीसाठी ९३ रुपये द्यावे लागणार आहेत. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यासाठी संपाचा इशाराही दिला होता. अखेर परिवहन विभागाने भाडेवाढीस मंजुरी दिली. रिक्षाच्या भाडय़ात पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये, टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचे भाडे १ ऑक्टोबरपासून २१ रुपयांवरून २३ रुपये, टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये होणार आहे. रिक्षातून रात्री १२ नंतर दीड किलोमीटर प्रवास करण्यासाठी २७ रुपयांऐवजी २९ रुपये आणि टॅक्सीसाठी ३२ रुपयांऐवजी ३५ रुपये आकारण्यात येणार आहेत. रिक्षामधून दिवसा पाच किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी ७१ रुपयांऐवजी ७७ रुपये आणि रात्री बारानंतर पाच किलोमीटर प्रवासासाठी ८९ रुपयांऐवजी ९६ रुपये द्यावे लगाणार आहेत. तर, दिवसा दहा किलोमीटर प्रवासासाठी १४२ रुपयांऐवजी १५३ रुपये द्यावे लागतील. काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीचा प्रवासही महाग ठरणार आहे. पाच किलोमीटपर्यंत ८५ रुपयांऐवजी ९३ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच किलोमीटरसाठी १०६ रुपयांऐवजी ११७ रुपये द्यावे लागतील. ‘क्यूआर कोड’ची सुविधा.. रिक्षा आणि टॅक्सीची नवीन भाडेदर लागू करताना मीटरमध्ये बदल करावे लागणार असून हे बदल होईपर्यंत चालकांना नवीन भाडे दरपत्रक देण्यात येणार आहे. त्यावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यास परिवहन विभागाने आकारलेले अधिकृत दरपत्रक पाहता येईल. त्यामुळे प्रवाशाची फसवणूक होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.