शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कोणाचा यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाची लढाई निवडणूक आयोगात पोहचली. आयोगासमोर या वादावर सुनावणी सुरू असतानाच आता शिंदे गटाचे मंत्री शंभुराजे देसाई यांनी "आम्हालाच अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळेल," असा मोठा दावा केला आहे. ते मंगळवारी (१७ जानेवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते. शंभुराजे देसाई म्हणाले, "जेव्हा जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली तेव्हा आम्ही 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाची भूमिका अधिकृतपणे कागदपत्रांसह लेखी स्वरुपात मांडली. आमदारांमधील बहुमत आमच्याकडे आहे. खासदारांमधील बहुमतही आमच्याकडेच आहे. नगरसेवक आणि पक्षाच्या जिल्हा प्रमुखांमधील बहुमत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडे आहे." "…म्हणून आम्हालाच अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळेल" "सर्व लोकप्रतिनिधींमधील बहुमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आम्ही दाखल केलेल्या सगळ्या बाबींचा केंद्रीय निवडणूक आयोग विचार करेल. म्हणून आम्हालाच अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळेल आणि पक्षचिन्हही मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे," असं शंभुराजे देसाईंनी सांगितलं. "विरोधकांनी थोडा दम धरावा" महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली होती. यावर बोलताना शंभुराजे देसाई म्हणाले, "विरोधकांनी थोडा दम धरावा. दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दालनाला किती प्रतिसाद मिळाला हे सर्वांनी पाहिलं. पहिल्या दिवशी जवळपास ४५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार महाराष्ट्राबरोबर झाले." हेही वाचा : “आत्ता निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये, कारण १६ आमदार…”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचं महत्त्वाचं विधान "मुख्यमंत्री दावोस परिषदेची फलश्रुती काय आहे हे सांगतील" "महाराष्ट्राला काही मिळत नाही असं ज्यांनी म्हटलं, त्यांनी थोडं थांबावं, पूर्ण दावोस परिषद होऊ द्यावी असं मी सांगेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस परिषदेची फलश्रुती काय आहे, राज्याला काय मिळालं हे अधिकृतपणे सांगतील. त्यानंतर विरोधकांनी बोलावं," असंही शंभुराजे देसाई यांनी नमूद केलं.