करोनाचा संसर्ग कमी होताच लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वातानुकूलित श्रेणीतील प्रवाशांना चादर, उशी देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने मार्च २०२२ मध्ये घेतला होता. त्यानंतरही मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या ९३ पैकी ४७ गाड्यांमध्ये ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पुढील महिन्यापासून उर्वरित सर्व गाड्यांमध्ये चादरी आणि उशी देण्यात येतील, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारी २०२० पासून करोनाचा संसर्ग वाढत गेला आणि मार्चपासून देशभरात टाळेबंदी लागू झाली. त्यानंतर रेल्वे प्रवासावरही निर्बंध आले. केवळ श्रमिकांसाठी रेल्वे चालवताना संसर्ग पसरू नये यासाठी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या अन्य सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात चादरी आणि उशींचाही समावेश होता. त्यामुळे वातानुकूलितील श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोबत चादर घेऊनच येण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले होते. करोनाकाळात बंद करण्यात आलेल्या सुविधा संसर्ग नियंत्रणात येताच मार्च २०२२ पासून रेल्वेने पुन्हा सुरू केल्या. मात्र मध्य रेल्वेच्या पाच विभागांच्या अखत्यारितील ९३ गाड्यांमध्ये ही सुविधा पूर्णपणे सुरू झालेली नाही. ९३ पैकी ४७ गाड्यांमध्ये ही सुविधा मिळत आहे. दररोज सुमारे ५५ हजार चादरी उपलब्ध करण्यात येत आहेत. ऑगस्टपासून सर्व गाड्यांमध्ये ही सुविधा मिळेल. त्यावेळी एक लाख चार हजार चादरी उपलब्ध करण्यात येतील. प्रवाशांना चादर आणि एक उशी देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.