मुंबई : ‘आम्ही खोटे कथानक रचून निवडून आलो, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपची अन्य मंडळी नैराश्यातून करीत आहेत. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मंगळसूत्र काढून नेतील, तुमची संपत्ती जास्त मुले होणाऱ्यांना वाटतील, घरातील नळ काढून नेतील, मालमत्ता काढून घेतली जाईल, म्हैस चोरून नेतील, नकली सेना, प्रत्येकाला नोकरी व घर देणार, उद्योगधंदे येतील हे तुमचे खरे कथानक होते का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना उद्देशून शनिवारी केला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना भाजपच्या बैठकीत महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांबरोबरच खोटे कथानक या चौथ्या घटकामुळे अपयश आल्याचे मत फडणवीस यांनी मांडले होते. याकडे ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी फडणवीस यांनाच प्रतिप्रश्न केला. आम्ही केले ते खोटे कथानक. मग घरे देऊ, नोकऱ्या देऊ, उद्याोगधंदे सुरू करू वगैरे हे सारे काही खरे कथानक होते का, अशी विचारणा केली.

हेही वाचा >>> राज्यात ४८३ गावांना दरडींचा धोका; रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणे निश्चित

‘अच्छे दिन’ किंवा १५ लाख बँक खात्यात जमा करू या भाजपच्या आश्वासनांचे काय झाले? महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या तरी मुंबईत आम्हाला दोन लाख जास्त मते मिळाली, असे फडणवीस सांगतात. मग देशातील १४० कोटी जनतेपैकी पात्र मतदारांपैकी किती लोकांनी भाजपला मतदान केले आणि विरोधात झालेले मतदान याची तुलना करता भाजपपेक्षा विरोधातील मते जास्त आहेत. ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्यास संविधान बदलू हे आम्ही सांगत नव्हतो. तर भाजपच्या काही मंडळींनीच जाहीरपणे वक्तव्य केले होते. ते वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले वा पडद्यावर बघायला मिळाले. मग संविधान बदलणार हे खोटे कथानक आम्ही रचले हे फडणवीस कशाच्या आधारे दावा करीत आहेत, असा सवालही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजपमुक्त राम

मुंबई : अयोध्येत राममंदिर उभारले म्हणून भाजपची मंडळी हवेत होती. पण रामाचे वास्तव्य असलेल्या अयोध्या आणि नाशिकमध्ये भाजप किंवा मित्रपक्षांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याचा चिमटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला. अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नाशिकमध्ये काळाराम मंदिराचे दर्शन घेतले होते. भाजपने राममंदिराचे राजकारण करू नये, असे मी तेव्हाच विधान केले होते. प्रभु रामाचे वास्तव्य असलेल्या अयोध्या आणि नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा मित्रपक्षांचा पराभव झाला. यावरून ‘भाजपमुक्त राम’ झाल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ?

महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही वा मुख्यमंत्रीपद कोणाला देणार अशी कुचेष्टा भाजपकडून केली जात आहे. मग महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे भाजपने आधी जाहीर करावे. आता फडणवीस यांची अवस्था काय झाली आहे? हे लोकसभा निवडणुकीत दिसले. तिन्ही पक्ष ओसाडच आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

पारिजात फुलला माझ्या दारी….

महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा भाऊ ठरला याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी माणिक वर्मा यांच्या ‘पारिजात फुलला माझ्या दारी, फुले का पडती शेजारी’ गाण्याचा उल्लेख करीत पारिजाताला खतपाणी घालण्याचे सोडणार नाही, असे उत्तर दिले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे हे पुन्हा भाजपबरोबर जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शेजारी बसून कसे सांगू, अशी गुगली टाकली.

रा. स्व. संघाला अजित पवारांचा कदातिच वेगळा अनुभव

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजित पवार यांच्याबद्दल काही वेगळा अनुभव आला असल्यानेच कदाचित रा. स्व. संघाच्या विचारांशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ या निकलकालिकेत प्रतिकूल मते मांडली असावीत, अशी टीका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. राज्यातील भाजपच्या अपयशाबद्दल ‘ऑर्गनायझर’ या संघ विचारांच्या निकयकालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेतल्याबद्दल खापर फोडण्यात आले आहे. याबाबत शरद पवारांना विचारण्यात आले असता, रा. स्व. संघाला अजित पवारांबद्दल काही वेगळा अनुभव आला असेल, अशी टिप्पणी केली. मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने काही आश्वासन दिले असल्यास त्याची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागावाटपावर काँग्रेसची भूमिका काय?

लोकसभेच्या निकालावर जागावाटप व्हावे अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली असताना, जागावाटप हे विजयाची शक्यता गृहित धरूनच केले जाईल, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही हे समोर आले. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित नव्हते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.