पतीने पत्नीकडे क्षुल्लक गोष्टींची मागणी करणे म्हणजे क्रूरता वा छळवणूक होत नाही, असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपातून एकाची निर्दोष सुटका केली.
न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत मधुकर कांबळी याची पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सुटका केली. दंडसंहितेच्या कलम ४९८ (अ) नुसार पत्नीकडे सतत किमती वस्तू वा मालमत्तेची मागणी करणे, हे छळवणुकीच्या आरोपामध्ये अपेक्षित आहे. मात्र या प्रकरणामध्ये मधुकरने पत्नी वंदना हिला वडिलांकडून दोनवेळा कोंबडी आणण्याव्यतिरिक्त काहीच मागणी केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची क्षुल्लक मागणी हुंडाबळीच्या कलमाअंतर्गत छळवणूक या व्याख्येत येत नाही वा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे कारणही ठरू शकत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने याप्रकरणी निकाल देताना दिला आहे.
मे १९९५ मध्ये मधुकर व वंदना यांचा विवाह झाला होता. मात्र नोव्हेंबर १९९५ मध्ये वंदनाने पेटवून घेत आत्महत्या केली. वडिलांच्या घरून कोंबडी घेऊन येण्याची मधुकरची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या मंडळींनी आपली छळवणूक केल्याची तक्रार वंदनाने दोनवेळा वडिलांकडे केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु मधुकरचे वकील जी. एस. हिरानंदानी यांनी वंदनाने या आरोपांमुळे नाही, तर घटनेपूर्वी मधुकरसोबत झालेल्या भांडणामुळे संतापून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला. सगळ्याच पती-पत्नींमध्ये छोटे-मोठे वाद होतात. परंतु त्यामुळेच आत्महत्या केली, असे म्हणणे चुकीचे आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला.