सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा हे मुद्दे प्रचंड चर्चेत आहेत. राज्यातील राजकारण सध्या या विषयाच्याच भोवती फिरत आहे. भोंगे आणि हनुमान चालीसा या वादात आता उडी घेतली आहे ती अभिनेता सोनू सूद याने. धर्म,जातीतून बाहेर पडल्यानंतर लाऊडस्पीकरवर अजान किंवा चालीसेचा आवाज नाही तर माणुसकीचा आवाज येईल असं विधान सोनू सूद याने केलं आहे.

यावर बोलताना सोनू सूद पुढे म्हणाला की, कोविड काळात आपण लोकांच्या आशिर्वादाने ईथपर्यंत पोहचलो आहोत. आपल्याला आणखी फार पुढे जायचे असल्याचं सोनू सूद याने सांगितलं आहे. हा वाद खूप दुःखद आहे. जेव्हा लोक अडचणीत होती, जेव्हा लोकांना ॲाक्सिजनची गरज होती तेव्हा जात धर्म पाहीला नाही. तेव्हा देशाला जोडले गेलो. घट्ट नातं होत गेलं. आता धर्म आणि जात यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. धर्म,जातीतून बाहेर पडल्यानंतर माणुसकीची चर्चा कराल तेव्हा लाऊडस्पीकरवर अजान किंवा चालीसेचा आवाज येणार नाही माणुसकीचा आवाज येईल.  

पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी सोनू सूद चर्चेत आला होता. उत्तर प्रदेश आणि बिहार येथून आलेल्या मजुरांना कोविड काळात त्यांच्या घरी परत जाण्यासाठी खुप अडचणी येत होत्या. अनेक लोकं मुंबईहून चालत आपल्या गावाच्या दिशेने निघाली होती. यावेळी लोकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण होते. यावेळी सोनू सूद याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील या लोकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी स्वखर्चाने खाजगी बसची व्यवस्था केली होती. त्यावेळी सोनू सूद चर्चेत आला होता. सोनू सुदवर तेव्हा तो करत असलेलं काम हे राजकीय पक्षाकडून प्रेरित असल्याचा आरोपही केला गेला होता.