चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना दिलेली परवानगी मागे घेऊन कायद्याचे उल्लंघन टाळावे. तसेच राज्यातील करोनाची गंभीर स्थिती, तिसऱ्या लाटेचा धोका आणि पुराचे संकट ध्यानात घेऊन बदल्या टाळाव्यात, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी केले.

मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीची मर्यादा वाढवून २५ टक्के केली आहे. त्यासोबत विशेष कारणास्तव १० टक्के बदल्यांना परवानगी दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे २००५ साली राज्यात बदलीचा कायदा झाला व एकूण संख्येच्या तीस टक्केपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास कायद्याने प्रतिबंध झाला आहे. तथापि, एकूण ३५ टक्के बदल्यांना परवानगी दिल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते, असे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बाजार मांडल्याच्या तक्रारी उघडपणे होत आहेत. राज्यातील करोनास्थिती अजूनही गंभीर असल्याची राज्य सरकारची धारणा आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्यास करोना कामावर प्रतिकूल परिणाम होईल. तसेच पूरग्रस्त भागात लोकांना मदतीची तातडीने गरज असताना सरकारी यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बदल केले तर अडचणी येतील, असे पाटील यांनी नमूद केले.