निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांकडून टीका-टीप्पणी करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी मेळावे सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी विक्रोळी झालेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

हेही वाचा – “…तर बाळासाहेबांना काय उत्तर दिलं असतं?”; सुनील राऊतांनी सांगितला न्यायालयातला ‘तो’ प्रसंग

काय म्हणाले सुनील राऊत?

“भाजपाने कितीही अन्याय केला तरी संजय राऊत बाहेर येतील. आणि भाजपाच्या अन्यायविरोधात उठवण्याचे काम करेल, महाराष्ट्रात पुन्हा एकदा ते शिवसेनेचा आवाज भक्कम करण्याचा प्रयत्न करतील, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली. बंडखोरी नंतर मलाही पैशांची ऑफर होती. ४० गद्दारांपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला आली होती. मात्र, पैशांपेक्षा मला शिवसैनिकांचे प्रेम आणि समर्थन मोलाचे आहे”, असेही ते म्हणाले.

शिंदे गटासह फडणवीसांवर निशाणा

“जोपर्यंत भाजपाचे राज्य आहे, असा अत्याचार सुरू राहणार आहे. भाजपाला काहीही झालं तरी सत्ता पाहिजे. १०० पेक्षा जास्त आमदार असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि ज्यांचा काही पक्ष नाही, नाव नाही ती व्यक्ती मुख्यमंत्री कशी? एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कोणताही पक्ष नाही, अशा व्यक्तीच्या नेतृत्त्वात फडणवीस कधीच काम करणार नाही. केवळ एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेना संपवण्याठी ते काम करत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – केवळ धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यासाठी शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व निवडणुकीचे कारण पुढे?

“ते अश्रू फुटक जाणार नाहीत”

“उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे वर्षा बंगला सोडावा लागला. त्यावेळी प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू होते. जेव्हा संजय राऊत यांना अटक झाली. तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होत. माझे वडील वारल्यानंतर माझी आई पहिल्यांदाच रडली. मात्र, हे अश्रू फुटक जाणारे नाहीत”, असेही ते म्हणाले.