सल्लागार नियुक्तीसाठी २९ कोटींचा खर्च अपेक्षित मुंबई : सफाई कामगारांच्या वसाहत पुनर्विकासासाठी साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर आता या कामांच्या देखरेखीसाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत. एकेका वसाहतींच्या पुनर्विकासाच्या खर्चाच्या रकमेवर काही टक्के सल्लागार शुल्क देण्यात येणार आहे. नऊ गटातील वसाहतींच्या विकासासाठी एकूण २९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा विभागातील सफाई कामगार दोन पाळय़ांमध्ये शहर स्वच्छतेचे काम करतात. या कामगारांना सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री उशिरा १० वाजेपर्यंत दोन पाळय़ांमध्ये काम करावे लागते. त्यामुळे त्यांची सेवानिवासस्थाने कामाच्या ठिकाणाच्या जवळ असणे आवश्यक आहे. पालिकेच्या एकूण ४६ वसाहती असून त्यामध्ये एकूण २९ हजार ६१८ पैकी ५,५९२ सफाई कामगारांना सेवानिवास्थान देण्यात आले आहे. तसेच या वसाहती १९६२ पूर्वीच्या आहेत. या वसाहतींमधील घरे १५० चौरस फूटाची असल्याने कामगारांच्या कुटुंबांना ही जागा अपुरी पडते. त्यामुळे पालिकेने आश्रय योजनेअंतर्गत या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचे ठरवले आहे. सफाई कामगारांचे राहणीमान उंचावण्यासाठी वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईतील ४६ वसाहतींपैकी शहरात २०, पश्चिम उपनगरात ११ व पूर्व उपनगरात ८ अशा ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. ३९ पैकी ३५ ठिकाणच्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ११ गट करण्यात येणार असून त्याबाबतचे प्रस्तावही मंजूर झाले आहेत. तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा हा प्रकल्प असून या प्रकल्पसाठी सल्लगार नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याकरिता २९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. ३५ वसाहतींपैकी २२ वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पालिका प्रकल्प सल्लागार नियुक्त करणार आहे. या प्रकल्प सल्लगारांना प्रकल्पाच्या १ ते २ टक्के रक्कम शुल्क म्हणून देण्यात येणार आहे. २२ वसाहतींच्या पुनर्विकासाच्या सल्लागारांसाठी पालिका २९ कोटी २२ लाख रुपये खर्च पालिका करणार आहे. परवानग्यांची जबाबदारी सल्लागाराची इमारतीची संकल्पचित्र आराखडे तपासण्याबरोबर विविध पातळय़ांवर मंजुरी मिळवण्यासाठी सल्लागाराला सहाय्य करावे लागणार आहे. तसेच, सागरी नियमन क्षेत्राबरोबर इतर शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी सल्लागाराची असेल. कामाचा नियमित आढावा घेणे, त्याचबरोबर कामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही सल्लागारावरच असणार आहे.