मुंबई : महाराणा प्रताप यांचे भारताच्या इतिहासात अजरामर स्थान आहे. त्यांचा स्वाभिमानी बाणा, शूर पराक्रमाने मातृभूमीचे रक्षण हे कार्य कधीही विसरले जाऊ शकत नाही. तेजाभिमानी राजा महाराणा प्रताप यांचा केवळ पुतळा उभारून न थांबता त्यांचा तेजस्वी विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वाची आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. तेजाभिमानी राजा म्हणून इतिहासात अजरामर नोंद झालेले महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ भव्य पुतळा माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. तसेच महाराणा प्रताप चौकाचे संपूर्ण सुशोभीकरणदेखील करण्यात आले आहे. या पुतळय़ाचे अनावरण आणि चौक सुशोभीकरणाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.