पाळीव कुत्र्याच्या वादातून घडला प्रकार
घोडबंदर भागातील पातलीपाडा उड्डाण पुलाजवळ पतीदेखत एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपप्रकरणी तिघांची मंगळवारी ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली. प्रत्यक्षात कारमधून बाहेर पडलेल्या पाळीव कुत्रीला आवाज दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
मुंब्रा भागात राहणारे दाम्पत्य रविवारी मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने घरी परतत होते. त्या वेळी फाऊंटन हॉटेलकडून ठाण्याच्या दिशेने येत असताना पातलीपाडा पुलाजवळ कारमधून आलेल्या तिघांनी त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर या तिघांनी पतीदेखतच महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी नरेश सूर्यवंशी (२३), राजन मिठारे (२८) आणि आतिष घोसाळकर (२८) या तिघांना सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी या तिघांना ठाणे न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका झाली, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मिरकुटे यांनी दिली.  
नरेश, राजन आणि आतिष यांचा एक मित्र पातलीपाडा येथील उड्डाण पुलाजवळ कारमधून उतरला. त्या वेळी त्यांच्या कारमध्ये असलेली पाळीव कुत्रीही कारमधून बाहेर पडली. त्यामुळे या तिघांनी तिला आवाज दिला असता, आपली छेडछाड करीत असल्याचा संशय दाम्पत्याला आला. त्यामुळे दाम्पत्याने मोटारसायकल थांबवून त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच हा प्रकार घडला, अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी दिली.