मुंबई: मुंबई ते दिल्ली प्रवास वेगवान होणार आहे. या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळांची क्षमता वाढवितानाच अन्य कामे करावी लागणार आहेत. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेला ४५० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली आहे. आधीही प्रकल्पाला निधी मिळाला असून काही कामेही सुरु झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मार्च २०२४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे या मार्गावरील वेग प्रतितास १३० किलोमीटरवरून १६० किलोमीटपर्यंत होणार आहे. परिणामी, दिल्लीपर्यंत राजधानी एक्स्प्रेसचा होणारा १६ तासांचा प्रवासही १२ तासांत शक्य होईल. मुंबई ते दिल्ली दरम्यान राजधानी एक्स्प्रेससह ३० हून अधिक गाडय़ा धावतात. त्यांना १६ तास, तर या मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडय़ांना १४ तास लागतात. मुंबई ते दिल्ली मार्गावर काही ठिकाणी वळणदार मार्गिका असल्याने गाडय़ांचा वेग कमी होतो. परिणामी, ताशी १३० किलोमीटर वेगाने धावू शकणाऱ्या गाडय़ाही जास्तीत जास्त प्रतितास ११० किलोमीटर वेगाने धावतात. मुंबई ते दिल्ली मार्गावर प्रतितास १३० किलोमीटर वेगाने रेल्वे धावत असून साधारण अडीच वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. आता प्रतितास १३० किलोमीटरहून प्रतितास १६० किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या चालवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु झाले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी मुंबई ते दिल्ली मार्गिकांची वेग क्षमता वाढवण्याच्या प्रकल्पाचा खर्च ६ हजार ६०० कोटी रुपये असल्याचे सांगितले. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात १ हजार ३४० कोटी रुपये मिळाले होते. यंदा ४५० कोटी रुपयांचीही तरतुद झाली आहे. या कामांसाठी ५६ निविदांपैकी ७५ टक्के निविदा काढण्यात आल्या आहेत. बाकी निविदांची प्रक्रिया सुरु आहे. रुळांची क्षमता वाढवितानाच, सिग्नल, ओव्हरहेड वायर, पुलांची दुरुस्ती यासाठी संरक्षक भिंत, इत्यादींचीही कामे या मार्गावर करावी लागणार असून काही कामांना सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. मुंबई ते दिल्ली मार्गाचे काम पूर्ण झाल्यास १६ तासांचा असलेला प्रवास चार तासांनी कमी होईल. या मार्गावर राजधानी, शताब्दी, दुरान्तोसारख्या गाडय़ा धावतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.