विरारमध्ये आज (रविवार) सकाळी एका वाहन दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विरार पूर्व चंदनसार येथील राई पाडा परिसरात आज सकाळी ५ वाजताच्या दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने एका कारमधून चार जण प्रवास करत असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार एका झाडावर जाऊन आदळली आणि दोन तीनदा उलटून ती रस्त्याच्या खाली जाऊन पडली. यात दिपेश मर्चंडे (२२), जतीन पाटील(२१) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी माहिती दिली की, वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.