जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत असल्याने निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. त्यानुसार सर्व किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धालय आदी खाद्यदुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. आज, बुधवारी सकाळपासून त्याची अंमलबजावणी होईल. राज्य सरकारने गेल्या आठवड्यापासून निर्बंध लागू करताना संपूर्ण राज्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू के ली. मात्र अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवण्यात आली. किराणा मालाची तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवेतील काही सवलतींवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडण्यात आला होता. अखेर याबाबत निर्णय घेतल्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तसे आदेश मंगळवारी जाहीर केले. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धालय, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यदुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तिक व संघटनात्मक) विक्री करणारी दुकाने सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत उघडी राहतील. मात्र या दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत मुभा असेल. परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते. रामनवमीला धार्मिक कार्यक्रमांवर बंदी करोनाच्या पार्श्वभूमीवर रामनवमी उत्सव घरातच साधेपणाने साजरा करावा. कोणालाही मंदिरात पूजा करण्यासाठी जाता येणार नाही. तसेच मंदिरात भजन, कीर्तन करण्यास तसेच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासही सरकारने मनाई केली आहे. शक्य असल्यास मंदिराच्या व्यवस्थापनाने ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी, असेही गृहविभागाने आदेशात म्हटले आहे. महावीर जयंती आणि हनुमान जयंतीही साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.