देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या सिंघानिया कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला आहे. कुटुंबातील विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यातील वाद न्यायालयात गेला आहे. एकेका पैशासाठी झगडण्याची वेळ मुलाने आणल्याचा आरोप रेमंड लिमिटेडचे मालक विजयपत सिंघानिया यांनी केला आहे. गौतम सिंघानिया रेमंड कंपनी स्वत:च्या जहागिरीप्रमाणे चालवत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. देशातील नामांकित ब्रँड असणाऱ्या रेमंड लिमिटेडची जबाबदारी मुलगा गौतमकडे सोपवल्यानंतर विजयपत सिंघानिया मुंबईतील ग्रँड पराडी सोसायटीमध्ये राहतात. विजय सिंघानिया यांनी मलबार हिल येथील ड्युपलेक्स घराचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विजय सिंघानिया आर्थिकदृष्ट्या अतिशय संकटात असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आहे. विजय सिंघानिया यांनी मलबार हिलमधील ज्या घरासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या इमारतीचे बांधकाम १९६० मध्ये करण्यात आले आहे. ही इमारत त्यावेळी १४ मजल्यांची होती. यानंतर या इमारतीमधील ४ ड्युप्लेक्स रेमंडची उपकंपनी असलेल्या पश्मिना होल्डिंग्सला देण्यात आले. २००७ मध्ये कंपनीने इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी इमारतीमध्ये विजय सिंघानिया, गौतम सिंघानिया, वीणादेवी (सिंघानिया यांचे दिवंगत बंधू अजयपत सिंघानिया यांची पत्नी) आणि त्यांचे पुत्र अक्षयपत आणि अनंतपत सिंघानिया यांना प्रत्येकी एक-एक ड्युप्लेक्स घर देण्याचा करार झाला होता. यासाठी नऊ हजार प्रति फीट दराने किंमत मोजावी लागणार होती. अपार्टमेंटमधील स्वत:चा हिस्सा मिळवण्यासाठी वीणादेवी आणि अनंतपत यांनी आधीच एक संयुक्त याचिका न्यायालयात दाखल केली आहे. तर अक्षयपत यांनी या प्रकरणात एक स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. विजयपत सिंघानिया यांनी त्यांची सर्व संपत्ती मुलाच्या नावे केली असल्याचे त्यांचे वकील दिनयर मेडन यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र मुलगा त्यांची काळजी घेत नसल्याची माहितीही वकिलांनी न्यायालयाला दिली. 'सिंघानिया यांनी कंपनीतील त्यांच्या मालकीचे समभाग मुलाला दिले आहेत. या समभागांची किंमत १ हजार कोटी इतकी आहे. मात्र आता गौतम सिंघानिया त्यांची जबाबदारी घेत नाहीत. गौतम यांनी विजयपत यांची गाडी आणि चालकदेखील काढून घेतला आहे,' अशा शब्दांमध्ये वकिलांनी विजयपत यांची व्यथा न्यायालयात मांडली.