मुंबई :मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता सुनावणी घेणाऱ्या समितीने अंतिम आराखडा आयोगाला सादर केला आहे. रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होती. आता या आराखडय़ाची तपासणी करण्यासाठी अजून आठ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे व त्यानंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात येणार असल्यामुळे त्याकरिता प्रभाग पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर तयार करण्यात आला आहे. या सुधारित प्रभाग रचनेवर महानगरपालिकेकडून सूचना व हरकती मागवल्या होत्या. प्रभाग रचनेवर ८१२ सुचना व हरकती आल्या होत्या. या सर्व हरकतींची छाननी केल्यानंतर त्यावर २२ व २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी पार पडली. राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, महानगरपालिका आयुक्त, शहर आणि उपनगरचे जिल्हाधिकारी यांची समिती निवडणुक आयोगाने तयार केली होती. या समितीने ही सुनावणी पूर्ण केली.