सेवाकार्यात समाजसेवी संस्था व दानदात्यांचा सहभाग

नागपूर : नागपूरवरून  बुधवारी बिहार मुजफ्फरपूरकडे निघालेल्या रेल्वेतील सुमारे एक हजारावर परप्रांतीय प्रवाशांची भोजन व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली.

टाळेबंदीत अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र शासनातर्फे विशेष रेल्वे गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे देशातील विविध भागात अडकलेले लोक स्वगृही पोहोचत आहे. रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या अशा परराज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी महापलिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने प्रभारी उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सेवाकार्य करण्यात येत आहे. महापालिकेच्या या उपक्रमाला शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांचे सहकार्य मिळाले आहे. शहरातील मैत्री परिवार, लॉयन्स क्लब, माँ फाऊंडेशन, राजमुद्रा फाऊंडेशन, दिलीप चिंचमलातपुरे या सर्वाच्या सहकार्याने एक हजारावर प्रवाशांना पुरी भाजी, केळी, पाण्याची बॉटल, ग्लुकोज बिस्कीट, लोणचे आदी सर्व वितरित करण्यात येत आहे.

शहरातील बेघर, निराधारांसह गरजूंची भोजन व्यवस्था केली जात असताना आता अनेक तासांचा प्रवास करून घरी परत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचीही जेवणाची व्यवस्था व्हावी, आयुक्तांच्या पुढाकाराने परराज्यातील नागरिकांना स्वगृही पोहोचवणाऱ्या रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीमधील प्रवाशासाठी महापालिकेच्या माध्यमातून भोजन व्यवस्था केली जात आहे.

शहरात टाळेबंदीमध्ये शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने दररोज ५० हजारावर जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येतात. बुधवारी रामटेक, कळमेश्वर, नरखेड, काटोल, उमरेड, सावनेर, नागपूर ग्रामीण, कुही, मौदा, हिंगणा, भिवापूर, कामठी, नागपूर शहरातील बेघर निवारा केंद्र आणि उस्मानाबाद येथील सुमारे एक हजार नागरिक महापालिकेच्या प्रयत्नामुळे स्वगृही पोहोचणार आहेत.