नागपुरात नागरिकांनी मिळून गुंडाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शांतीनगर परिसरातील नालंदा चौकात ही घटना घडली आहे. आशिष देशपांडे असं या गुन्हेगाराचं नाव असून वस्तीतील गल्ल्यांमध्ये त्याच्या बेदरकार दुचाकी चालवण्याला लोक कंटाळले होते. नागरिकांनी अनेकदा त्याची पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याने अखेर नागरिकांनी कायदा घेतात आशिष देशपांडेची हत्या केली. आशिष देशपांडे इतर गुन्ह्यांमध्येही सहभागी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष देशपांडे नेहमी वस्तीतील लोकांना त्रास द्यायचा. गल्लीमधील अरुंद ठिकाणीही तो बेदरकारपणे दुचाकी चालवायचा. याशिवायही तो अनेकदा वस्तीतील नागरिकांना त्रास देत असे. सोमवारी रात्री ममता ढोक नावाच्या महिलेने त्याला जाब विचारला असता, त्याने शिवागीळ करत हल्ला केला. ममता ढोक यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याने आशिष तेथून निघून गेला होता.

मध्यरात्रीच्या सुमारास आशिष पुन्हा एकदा तिथे आला आणि अश्लिल भाषा वापरत शिवीगाळ करु लागला. यावेळी त्याच्या हातात चाकू होता. आशिष परिसरातील सर्वांनाच धमकावत असल्या कारणाने वस्तीमधील तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड, विटा, चाकूचा वापर करत आशिषवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आशिषचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली असून काहीजण फरार आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर कायदा हातात घ्यावा लागला नसता अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.