* राजाची गादी कायम, मात्र संकटे येणार *  देशासमोर चारा व पाणीटंचाईचे संकट *  बुलढाणा जिल्ह्य़ातील भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत
सुमारे ३०० वर्षांपासूनची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ाच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ घटमांडणीच्या भाकितानुसार यंदा लहरी पावसासह अतिवृष्टी होणार असून, पिकांची नासाडी व भावात तेजी-मंदी राहणार आहे. साधारण पण चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. देशासमोरही चारा व पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. राजकारणात विद्यमान राजाची गादी कायम राहणार असली तरी अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. देशाच्या संरक्षण खात्यासमोरही अनेक आव्हाने राहणार असल्याचे भेंडवळच्या भविष्यवाणीत म्हटले आहे.
अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ६ वाजता सारंगधर महाराज वाघ व पुंजाजी महाराज वाघ यांनी हजारोंच्या उपस्थितीत हे भाकीत व्यक्त केले. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थिती, याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेली भेंडवळची घटमांडणी यंदाही सोमवारी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर झाली. जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठवर वसलेल्या भेंडवळ गावात गेल्या ३०० वर्षांपासून घटमांडणीची परंपरा चालत आली आहे. वाघ घराण्यात ही परंपरा असून, चंद्रभान महाराज वाघ यांनी ती सुरू केली आणि आजही त्याच परिवारात ही परंपरा सुरू आहे. शेतकऱ्यांचा या मांडणीच्या भाकितावर प्रचंड विश्वास आहे. शेतकरी या मांडणीवर पीक पाण्याचे नियोजन करतात. यंदाही अक्षय्यतृतीयेला सुर्यास्तापूर्वी गावाबाहेर शेतात घटाची मांडणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरून भविष्य वर्तविण्यात आले.
त्यानुसार पावसाळ्यातील पहिला महिना जूनमध्ये साधारण पण लहरी पाऊस होईल. कुठे कमी आणि कुठे जास्त पाऊस राहील. जुलै व ऑगस्टमध्ये चांगला पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टी संभवते, तर सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील आणि काही भागात अतिवृष्टी होईल. पिकांमध्ये कपाशीचे पीक हे चांगले राहणार असून, गव्हाचे पीक साधारण राहील. त्याचा भाव कमी जास्त होईल. ज्वारीचे पीक चांगले राहणार असले तरी पिकाची नासाडी राहील. बाजरीचे पीक चांगले असून, तीळ साधारण राहील, पण तीळ पिकाची जास्त नासाडी होईल. यंदा तुरीचे पीक चांगले राहील. उडीद आणि मुगही चांगले राहणार असले तरी नासाडी होईल. हरभरा हे पीक चांगले असून, त्याचा भाव जास्त राहील. मटकीचे पीक साधारण राहील, असेही भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहे. तांदूळ, जवस यांची नासाडी व पिकांवर रोगराई राहणार असल्याचेही म्हटले आहे. देशात चारा व पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला.
देशात आर्थिक तणाव राहील. देश आर्थिक संकटात येईल. देशाच्या पंतप्रधानांना हे वर्ष बरे नाही. त्यांच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकटे येतील, असेही भाकितात व्यक्त करण्यात आले आहे. याशिवाय, देशाच्या संरक्षण खात्यावर ताण येईल. परकीय घुसखोरीचे आव्हानही देशासमोर असेल. त्यामुळे सैन्यासमोरील आव्हाने वाढतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या, तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढय़ाच विश्वासाने जपली जात आहे, त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. भेंडवळ घटमांडणीच्या ठोकताळय़ांवर लाखो शेतकऱ्यांचा विश्वास आहे.

अशी होते घटमांडणी
भेंडवळच्या घटमांडणीची एक विशिष्ट परंपरा आहे. त्यानुसार घटामध्ये अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मुग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा गोलाकार मांडली जाते. मध्यभागी खोल खड्डा करून त्यात पावसाळ्याच्या ४ महिन्यांचे प्रतीक असलेली ४ मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विडय़ाच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते. त्या घटामध्ये होणाऱ्या बदलानुसार दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तविण्यात येते.