यवतमाळ: अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पीक विमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांना ३५, ५०, ९० रुपये नुकसान भरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. या असंतोषाचे चित्र आज गुरुवारी यवतमाळात बघायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम नेण्यासाठी चक्क तिजोरी आणली. तिजोरी व सजवलेल्या बैलगाडीसह शेतकरी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले आणि त्यांनी विम्याच्या रकमेसाठी सशस्त्र संरक्षण देण्याची मागणी केली. या आंदोलनाने आज यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी अर्ज सादर केला. या अर्जामध्ये, ‘मी खालील सही करणारा पीक विमाधारक शेतकरी मौजा शिवणी ता. घाटंजी जि. यवतमाळ येथील रहिवासी आहे. याद्वारे आपणास नम्र निवेदन करतो की, या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने मला ५२ रुपये ९९ पैसे इतक्या रक्कमेचा भरीव पीकविमा मंजूर केला आहे. यामुळे मी खूप खुश झालो आहे. सदरची रक्कम माझ्यासारख्या एका गरीब शेतकऱ्यासाठी ५० खोक्यांपेक्षाही मोठी असल्याने या रकमेच्या सुरक्षेची मला फारच काळजी लागली आहे. शिवाय बँकेतून ही रक्कम पिशवी अथवा सुटकेस मधून नेणे मला शक्य नसल्याने रक्कम नेण्यासाठी मी वडिलोपार्जित तिजोरी व बैलबंडी आणली आहे. रुपये ५२.९९ इतक्या मोठ्या रक्कमेने भरलेली तिजोरी बैलगाडीवरून नेतांना रस्त्यात लुटमार होण्याची किंवा दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर माझ्या पीकविम्याच्या रुपये ५२.९९ कडे लागली आहे. माझ्यासाठी ही रक्कम अतिशय महत्त्वाची आहे. ‘सीबील’च्या अटीमुळे बँकेचे पीककर्ज न मिळाल्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज पीक विम्याच्या या पैशातून सर्वप्रथम फेडीन. उभ्या पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली प्राण्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करीन. तब्येत बरी नसतानाही शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या बायकोला दवाखान्यात नेईल. गेल्या अनेक महिन्यांपासून फाटक्या पॅटेंत शाळेत जाणाऱ्या पोराला कपडे घेईल. वयात आलेल्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न करीन अन् पूर्ण कुटुंबासह एकदा गुवाहाटीला पर्यटनासाठी जाऊन येईल. संकटग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात भरभराटी निर्माण करणाऱ्या देशी – विदेशी महागड्या गाड्यांच्या प्रदर्शनासाठी पालकमंत्री संजय राठोड यांना भरीव आर्थिक देणगी देईन व उरलीसुरली रक्कम तिजोरीत सांभाळून ठेवीन’, असा मजकूर या पत्रात आहे. या रकमेच्या सुरक्षेसाठी किमान सहा सशस्त्र पोलीस पुरवावे, अशी मागणी शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा… रोहणा गावात दोन गटात वाद; गोळीबारात एक ठार, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यासह जिल्हा हादरला!

या उपरोधिक आंदोलनातून शेतकऱ्यांनी सरकारला फटकारले आहे. जिल्ह्यातील आठ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी ५०९ कोटींचा विमा हप्ता भरला. त्यापोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तीन हजार १७७ कोटी रूपये नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात ५९ हजार शेतकऱ्यांना ४१ कोटी १० लाख रुपयेच मिळाले. जवळपास आठ लाख शेतकरी विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहे. त्यामुळे सरकारने एक रुपयात पीक विमा दिला की भीक दिली, असा सवाल यावेळी देवानंद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

आंदोलनात शैलेश इंगोले, अशोक भुतडा, प्रा. विठ्ठल आडे, संजय डंभारे, उमेश इंगळे, बंडु जाधव, घनशाम अत्रे, संगीत काळे, रामधन राठोड, रामचंद्र राठोड, वासुदेव राठोड, रणजीत जाधव, अमोल बेले, प्रदीप डंभारे, अरुण ठाकुर, लालसिंग अजमेरकर, कुणाल जतकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A safe was brought to carry 52 rupees of crop insurance protest of farmers in yavatmal nrp 78 dvr
Show comments