एका २१ वर्षाच्या तरुणीने २० वर्षीय युवकासोबत विवाह करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाइनने मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून हा प्रयत्न हाणून पाडत हा बालविवाह थांबविल्याची घटना शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.वरूड तालुक्यातील एका गावामध्ये २१ वर्षीय तरुणीचा विवाह २० वर्षीय युवकासोबत होत असल्याची माहिती आपत्कालीन सेवा चाइल्ड लाइन १०९८ ला प्राप्त झाली. त्यानुसार यासंदर्भात जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर शेंदूरजनाघाट पोलीस ठाणे गाठून ठाणेदार सतीश इंगळे यांच्याशी या प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुलाच्या घरी जाऊन शहानिशा करण्यात आली. गावातील एका तरुणीचे तेथीलच २० वर्षीय युवकासोबत प्रेमसंबंध असून त्यांनी लग्नाची तयारी केली, अशी माहिती यावेळी समोर आली. त्यानुसार चाइल्ड लाइनच्या पथकाने लग्न विधीचा कार्यक्रम होण्यापूर्वीच हा बालविवाह थांबविण्यात यश मिळविले. त्यानंतर सदर तरुणी व अल्पवयीन तरुणाचे समुपदेशन करण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होणे गरजेचे असल्याचे या तरुणीसह मुलाला तसेच गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांना सांगून कायद्याची जाणीव करून देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार तरुणी, तिची मावशी व अल्पवयीन युवकाच्या पालकांचे हमीपत्र लिहून घेण्यात आले. संबंधित तरुणी व पालकांना बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. पोलीस ठाण्याकडून नोटीसही बजावण्यात आली. हा बालविवाह थांबविण्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, चाइल्ड लाइनचे संचालक प्रा. डॉ. नितीन काळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे यांनी परिश्रम घेतले.