अकोला : तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे २६ मेपासून अतिसार, उलटी यांचे रुग्ण आढळून आल्याने गावात उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. उद्रेक प्रतिबंध संदर्भाने बेलखेड येथे गेल्या पाच दिवसांपासून प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. २३ पथकांकडून साडेसात हजारावर ग्रामस्थांची तपासणी केली. रविवारी आणखी २० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावातील नागरिकांना ‘कॉलरा’ रोगाची लागण झाली. दूषित पाण्यामुळे आजार झाल्याचे निदर्शनास आले. आजाराच्या प्राथमिक लक्षणानुसार गावातील नागरिकांना अतिसार व उलट्या होत असून त्यानुसार प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार केला जात आहे. आजाराच्या पार्श्वभूमीवर बेलखेड गावामध्ये विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. रविवारी २३ सर्वेक्षण पथकाद्वारे एक हजार ४०९ घरांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये सात हजार ६९५ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. २० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामध्ये अतिसार, उलटी, हगवणाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १२ आहे. एका रुग्णाला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. दोन रुग्ण बरे झाले. सध्या १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १८५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये अतिसार, उलटीचे लक्षण असलेले ६६ रुग्ण होते. चार रुग्णांना उपचारासाठी अकोला व तेल्हारा येथे पाठवण्यात आले असून ४८ रुग्ण उपचारातून बरे झाले आहेत.

हेही वाचा…सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देताय‌? अकोल्यात दोन पालकांवर गुन्हा; जाणून घ्या काय शिक्षा होणार?

उपचार व सर्वेक्षण मोहिमेमध्ये दोन हजार ४४७ मनुष्यबळ कार्यरत आहे. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस सहा, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस १०, समुदाय आरोग्य अधिकारी सहा आदी उपचार करीत आहेत. एकूण १३ पथकांमार्फत दररोज बेलखेड गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तसेच पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत साथ नियंत्रणात असून गावातील नागरिकांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित गावात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरित तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा…गोदी मीडियाचे एक्झिट पोल! नाना पटोलेंचा आरोप, म्हणाले,‘केंद्रीय गृहमंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूषित पाण्यामुळे साथ

दूषित पाण्यामुळे गावात आजाराची साथ उद्भवली आहे. जिल्ह्यात शहरे व गाव स्तरावर शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी महानगरपालिका, सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींनी आवश्यक कार्यवाही करावी. ग्राम स्तरावर सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी तातडीने ‘गुडमॉर्निंग’ पथके गठित करावी. गटविकास अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.