वडिलांची तहान भागविण्यासाठी पाणी आणायला गेलेल्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा येथे घडली आहे. वैष्णवी गजानन डाखोरे (१७) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील किन्हाळा येथे घडली.

वैष्णवी शेतात राबणाऱ्या वडिलांसाठी जेवण घेऊन गेली होती. दरम्यान, वडिलांसाठी पाणी आणायला विहिरीवर गेली असता ती पाय घसरून पाण्यात पडली. बराच वेळ झाल्यावरही परत न आल्यामुळे वडील गजानन डाखोरे यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर विहिरीत डोकाऊन बघितले असता मुलीचा मृतदेह त्यांना पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. वैष्णवी परंडा येथील संजय गांधी विद्यालयात अकरावीत शिकत होती.

दरम्यान, पुढील तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.