अमरावती : जिल्ह्यात दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विविध पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, भाजपच्या धृवीकरणाच्या प्रयोगाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी चार मुस्लिम उमेदवार दिल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसने अंजनगाव सुर्जी येथून नगराध्यक्षपदासाठी आयेशाबानो रशीद खान यांना, चिखलदरा येथून शेख अब्दूल शेख हैदर, अचलपुरातून नुरूसबा ऐहतेशाम नबील तर चांदूर बाजार येथून फरहाना तबस्सूम मो. साजिद यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने धामणगाव रेल्वे येथून वर्षा वसंतराव देशमुख, दर्यापूर येथून मंदाताई सुधाकर भारसाकळे, चांदूर रेल्वेमधून पूनम नीलेश सूर्यवंशी, मोर्शीतून दीपाली भडांगे, धारणीतून राजकिशोर मालवीय आणि नांदगाव खंडेश्वर येथून वीणा निशांत जाधव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. आज काँग्रेसच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले.
काँग्रेसने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत काही ठिकाणी त्यांचा थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपने दर्यापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती केली असून इतर ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. भाजपच्या धृवीकरणाच्या प्रयोगाला शह देण्यासाठी काँग्रेसने चार मुस्लिम उमेदवार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मतचोरी न झाल्यास विजय पक्का
संपूर्ण राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. लोक सरकारच्या धोरणांना कंटाळले आहेत. ते मतांमध्ये प्रतिबिंबित व्हायला हवे. पण, ज्या प्रकारे मतचोरीचा, मतदार व्यवस्थापनाचा खेळ भाजपकडून केला जात आहे, तो जर यावेळीही झाला, तर धोका होऊ शकतो. पण, आमचा विजय निश्चितपणे होईल, असा आत्मविश्वास आम्हाला आहे. ज्या भागात मुस्लीमांना योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे, त्यांना वेळोवेळी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. गेल्यावेळीही देण्यात आली होती. त्यात व्यूहनीती नाही, असे काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
धोका व्हायला नको
यशोमती ठाकूर म्हणाल्या, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. भाजपची मत चोरण्याची खेळी आता जगजाहीर झाली आहे. लोक आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. लोक मतदान यंत्रातून आपला रोष प्रकट करतील, पण धोका व्हायला नको, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
