गडचिरोली : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याचे सत्र कायम असून शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील कळमटोला जंगल परिसरात आज पुन्हा एकाचा वाघाने बळी घेतला. कृष्णाजी ढोणे (६५) असे मृताचे नाव असून तो गुरे चारण्याकरिता जंगलात गेला होता.

देसाईगंज तालुक्यात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात त्या परिसरात ३ नागरिकांचा वाघाने बळी घेतला. कालसुध्दा उसेगाव परिक्षेत्रात वरंब्या गोळा करणाऱ्याचा वाघाने बळी घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारी २ वाजताच्या सुमारास कळमटोला जंगल परिसरात गुरे चारायला गेलेल्या कृष्णाजी ढोणे यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून वाघांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.