चंद्रपूर : दूषित पाण्यामुळे राजुरा तालुक्यातील देवाडा व परिसरातील गावात 'गॅस्ट्रो'चा उद्रेक झाला आहे. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील ३ रुग्णांचा व एकाचा घरी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देवाडा येथे भेट देवून जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे लोकांचे मृत्यू झाल्याचा थेट आरोप केला आहे. दुषित पाण्यामुळे देवाडा येथे रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचे माहिती असतानाही ग्रामसेवकाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने या गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जर लोकांना वेळीच शुध्द पाणी पुरविल्या गेले असते तर या गावात ४ रुग्णांवर मृत्यू ओढवला नसता. रुग्णालयात ४ रुग्ण दगावले व १ रुग्ण घरी दगावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णाची नोंद नसली तरी अजूनही गावातली परिस्थिती भयावह असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ९७ रुग्ण दाखल करण्यात आले असून त्यात देवाडासह, सोंडो, टेंभुरवाही व अन्य गावातील रुग्णांचा समावेश असताना आरोग्य यंत्रणा निद्रेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत अहीर यांनी देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करुन येथील आरोग्य कर्मचाऱ्यांवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याची बाब अधोरेखीत केली आहे. या ठिकाणी डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित नसतात. जे एमबीबीएस डॉक्टर आहेत ते येतच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शुध्द पेयजलासह आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी सूचना करतानाच या संपर्ण प्रकरणाचा वरिष्ठांना जाब विचारू, असेही अहीर यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगीतले.