केंद्र सरकारविरुद्ध ८ सप्टेंबरला देशव्यापी एल्गार; संघाचा सबुरीचा सल्ला नागपूर : केंद्र सरकार सातत्याने कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित भारतीय मजदूर संघ व भारतीय किसान संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नागपुरात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतरही दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र ताणा, पण तुटू देऊ नका, असा सबुरीचा सल्ला या दोन्ही संघटनांना दिल्याची सूत्रांची माहिती दिली. भारतीय किसान संघाने शेतकऱ्यांच्या सगळ्या कृषिमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे लाभकारी मूल्य/भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. ११ आगस्ट २०२१ ला भारतीय किसान संघाच्या अ.भा. अध्यक्षांनी पंतप्रधान व कृषिमंत्री यांना पत्र देऊन ३१ ऑगस्टपर्यंत यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली, मात्र केंद्राकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, प्रतिनिधी सभेत यावर किसान संघाने संघाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. संघाने त्यांना सबुरीचा सल्ला दिला असला तरी किसान संघ ८ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. भारतीय मजदूर संघाने महागाईच्या मुद्द्यावर व जीवनावश्यक वस्तूंचे दैनंदिन भाव वाढत असल्याने आंदोलनाची हाक दिली असून ९ सप्टेंबरला संघटनेचे पदाधिकारी आंदोलन करण्यावर ठाम आहेत. समन्वय बैठकीचा समारोप गेल्या दोन दिवसांपासून रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात सुरू असलेल्या संघाच्या समन्वय बैठकीचा शनिवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद आणि अन्य काही संघटनांचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. शनिवारी २० संस्थांनी गेल्या वर्षभराचा लेखाजोखा मांडला आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सरसहकार्यवाह अरुणकुमार, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित होते. सहकार क्षेत्रावर लक्ष केंद्रित सहकार आणि शिक्षण क्षेत्रावर संघाने लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: केंद्र सरकारने सहकार विभागाची निर्मिती केली असून संघाशी संबंधित सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांची भूमिका असावी यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय क्रीडा व शिक्षण या दोन्ही विषयांवर चर्चा झाली आहे. शाखा वाढविणार.संघशाखा वाढविण्याच्या दृष्टीने परिवाराच्या माध्यमातून काय करता येईल, नागरिक शाखांशी कसे जोडता येतील, या दृष्टीने विविध संस्थांना समन्वय समितीच्या बैठकीत कार्यक्रम देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात संघशाखांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या नियोजनावर बैठकीत चर्चा झाली असावी, असा अंदाज संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी व्यक्त केला.