बुलढाणा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन म्हणजे खळ्ळखट्याक किंवा तोडफोड असे सहसा चित्र असते. मात्र, नांदुरा येथील एकट्या पदाधिकाऱ्याने झाडावर बेमुदत उपोषण सुरू करून गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे.राजेश रामराव भालेराव, असे उपोषणकर्त्याचे नाव असून ते मनसेचे नांदुरा तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांनी आपले गाव माळेगाव गौड येथे एका झाडावर खाटेच्या मदतीने आसन बनविले आहे. त्यावर ठिय्या मांडून त्यांनी आज, मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. तसेच शासन व प्रशासनाला ‘जाब’ विचारला असून त्याचे उत्तर देण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी घेऊन त्यांनी स्वबळावर आंदोलन सुरू केले आहे. नांदुरा तालुक्यात २३ व २४ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टी व पुरांमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. घरांची मोठ्या संख्येने पडझड झाली, जनावरे वाहून गेली व दगावली. तसेच घरगुती साहित्यांची हानी झाली. याला अनेक दिवस झाल्यावरही मदत देण्यात आली नाही. याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा काळे यांचा आरोप आहे. निवेदने देऊनही दखल घेण्यात न आल्याने त्यांनी आता आंदोलनाचा पर्याय निवडला आहे.