शेजारी राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्दय़ावर नेहमी कांगावा करत असतो. यापुढे भारत असे होऊ देणार नाही, जागतिक पातळीवर त्यांना ठणकावून सांगावे लागेल असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले.
मैत्री परिवार, भोसला मिलिटरी स्कूल व प्रहार यांच्या वतीने रविवारी नागपुरातील आयटी पार्क परिसरात आयोजित ‘विजयी रणसंग्राम’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. देशात १९४७-४८ नंतर सातत्याने अंतर्गत युद्ध सुरू आहे. वेळेवर निर्णय घेण्यात न आल्याने काश्मीर प्रश्न जटिल बनला आहे. हैदराबाद आणि गोव्याचा प्रश्न मिटवला. त्याप्रमाणे काश्मीरचे झाले नाही. भारताला शक्ती बनायची आहे, परंतु असहिष्णुता दाखवून अशी शक्ती बनता येणार नाही. राष्ट्रभाव जागृत होणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. देशाचा इतिहास विचित्र पद्धतीने लिहिण्यात आला आहे. तो बदलला गेला पाहिजे.
‘जबाबदारीने वागावे’
आपल्या संसदीय कामकाजाकडे जगाचे लक्ष लागलेले असते. जागतिक लोकसभा अध्यक्षांच्या परिषदेत याचा अनुभव आला. एका देशाच्या लोकसभा अध्यक्षांनी तुम्ही शूर आहात. २५ खासदारांचा निलंबित करण्याचा चांगला निर्णय घेतला, अशा शब्दात माझे अभिनंदन केले, पण मला अशा प्रकारची शूरता नको आहे. लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी असे वागू नये, असे वाटते.