बुलढाणा: यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र स्वरूपाची असणार अशी चिन्हे असून तब्बल ९८६ गावांत पाणी पेटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पाच यंत्रणांनी मंजुरी दिलेल्या पाणी टंचाई कृती आराखडा वरील धोक्याची घंटा देणारा आहे. लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना पाणी पेटणार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. जिल्ह्यातील १४१० पैकी ९८६ म्हणजे तब्बल ७० टक्के गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे. नजीकच्या काळात १७७ गावात टंचाई तोंड वर काढणार अशी शक्यता आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान ३७४ गावांत टंचाईची तीव्रता वाढणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान आणखी ४३५ गावे टंचाईच्या विळख्यात सापडतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहे. हेही वाचा - अकोला : दुचाकीवरून तरुणांचा संशयास्पद वावर अन् पोलिसांच्या दिशेने गोळीबार; हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलीस…. टंचाईच्या मुकाबल्यासाठी तब्बल १९८० उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, विहीर खोल करणे व गाळ काढणे, प्रगतीवरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, तात्पुरती पूरक नळ योजना या योजनांचा समावेश आहे. हेही वाचा - अकोला : सात वर्षीय चिमुकला ११ दिवसांपासून बेपत्ता, अखेर श्वान पथकाने विहिरीत…. या योजनांवर ३९.२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात ११.१२ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १८.२१ कोटी तर तिसऱ्या टप्प्यात (जून अखेर) ९.८६ कोटी खर्च अपेक्षित आहे. नेहमीप्रमाणे टँकर व खाजगी विहीर अधिग्रहणसाठी सर्वाधिक खर्च लागणार आहे. यासाठी सुमारे २२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.