रवींद्र जुनारकर  

चंद्रपूर : आजवर झालेल्या सतरा लोकसभा निवडणुकांपैकी २०१९ च्या लोकसभेचा अपवाद वगळता चंद्रपूर या ओबीसीबहुल मतदार असलेल्या लोकसभा क्षेत्राने मुस्लीम, आदिवासी, जैन, ब्राह्मण व गवळी या अल्पसंख्याक समाजाचे खासदार निवडून दिले आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजाच्या माध्यमातून एक कथित पत्रक निघाल्याने ओबीसींत समाविष्ट ४२० जातींसोबतच मुस्लीम, ख्रिश्चन धर्म व तेली, माळी, न्हावी, सुतार, धोबी, शिंपी, भोई, सोनार, वाणी या समाजात अस्वस्थता आहे. केवळ कुणबी समाजानेच या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे, अन्य समाज नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

voter lists, Chandrapur,
जिवंत व्यक्ती मृत अन् मृत व्यक्ती जिवंत! चंद्रपुरात मतदार याद्यांचा गोंधळ, नावे नसल्याने मतदार संतप्त
Election in Akola Lok Sabha Constituency between BJP Vanchit and Congress
अकोल्यात चुरशीची तिरंगी लढत
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसीबहुल चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थनार्थ व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कुणबी समाजाच्यावतीने एक पत्र समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे. या पत्रामुळे सध्या ओबीसींमध्ये समाविष्ट असलेल्या इतर जाती समूहांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या लोकसभा मतदारसंघातून आजवर झालेल्या १७ लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक खासदार निवडून दिले आहे. १९५१ यावर्षी झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाचे अब्दुल ताहेर अली येथे निवडून आले होते. त्यानंतर व्ही.एन. स्वामी, आदिवासी समाजाचे लालशाम शाह भागवान शाह, काका कौशिक, अब्दुल शफी, राजे विश्वेश्वर महाराज, तेली समाजाचे शांताराम पोटदुखे, जैनधर्मीय नरेश पुगलिया काँग्रेस पक्षाकडून तर गवळी समाजाचे हंसराज अहीर हे अल्पसंख्याक समाजाचे खासदार भाजपकडून निवडून आले.

हेही वाचा >>>रामटेकमध्ये सेनेला भाजपकडून उमेदवार

२०१९ च्या लोकसभेत प्रथमच ओबीसीबहुल कुणबी समाजाचे सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर विजयी झाले. विशेष म्हणजे, केवळ कुणबी समाजाची मते मिळाली म्हणून धानोरकर विजयी झाले नाहीत तर त्यांना सर्व जाती, समाज व धर्मीयांची मते मिळाली. असे असतानाही केवळ कुणबी समाजाचाच खासदार हवा, कुणबी समाजाला उमेदवारी द्यावी, अशी हवा केली जात आहे.  कुणबी समाजाच्या अध्यक्षांच्या नावाने निघालेल्या या कथित पत्रामुळे येथे वादळ उठले असून इतर समाज नाराज व अस्वस्थ झाला आहे. आम्ही मतदान करतो, त्यामुळेच खासदार निवडून येतो, केवळ कुणबी समाजाच्या मतांवर खासदार निवडून येतो, असे असते तर दोन वेळा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप यांचा पराभव झालाच नसता, असाही एक मतप्रवाह आहे. तेव्हा कोणत्याही एका समाजाचे नाव समोर न करता सर्वधर्म, जाती, पंथीयांचा विचार व्हावा, असे बोलले जात आहे.

भाजप तथा काँग्रेस या दोन्ही पक्षातील बहुसंख्य प्रमुख पदांवर कुणबी समाजाच्या व्यक्तीचीच नियुक्ती केली आहे. त्यामुळे इतर समाजाने जायचे कुठे हा प्रश्न आहे. काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले या कुणबी समाजाच्या लोकांना संधी दिली तर भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष तसेच इतर प्रमुख पदांवर कुणबी समाजाला संधी दिली आहे. या सर्व पक्षांना अन्य समाज दिसत नाही का, असाही प्रश्न केला जात आहे.

आमदार धोटेंनी घेतली जोरगेवार यांची भेट

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. महायुतीच्या स्थानिक उमेदवाराकडून जोरगेवार यांना निमंत्रण मिळत नसताना महाविकास आघाडीच्या आमदाराने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीत सहभागी स्थानिक अपक्ष आमदार जोरगेवार यांचे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. ७५ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने अपक्ष राहून त्यांनी विजय संपादन केला. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत डावलून चालणार नाही, याची जाणीव महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे. दुसरीकडे, महायुतीचे उमेदवार अथवा महायुतीच्या नेत्यांनी आमदार जोरगेवार यांच्याशी अजूनही संपर्क साधला नाही तसेच महायुतीच्या जाहीर सभा, कार्यक्रमांचे निमंत्रण दिले नाही. नेमकी हीच संधी साधून महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शनिवारी आमदार जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

गोरगरीब, शेतकरीवर्गाच्या कल्याणासाठी निवडणूक  – मुनगंटीवार

नावापुढे आमदार किंवा खासदार हे पद लावण्यासाठी निवडणूक लढवत नसून गोरगरिबांचे कल्याण, शेतकरीवर्गाचा विकास, राष्ट्रविकासासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहे, असे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वरोरा येथे विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम ‘मिशन मोड’वर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.